महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मोर्चाद्वारे मागणी
विठ्ठल ममताबादे
उरण : वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबतीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी अनेक वेळा निवेदने, आंदोलने, मोर्चाद्वारे शासनाचे, उर्जा मंत्री यांचे लक्ष वेधून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे, मात्र अद्याप ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिटींगही घेतली नाही. त्यामुळे कामगारांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. उर्जामंत्री यांना इतर जबाबदारी असल्याने फडणवीस यांनी उर्जा खात्याचा कार्यभारातुन मुक्त व्हावे व ऊर्जा खाते योग्य व्यक्तीकडे सोपवण्यात येऊन कंत्राटी कामगारांच्या मागणी मान्य कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना केले आहे.

दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर अधिवेशनामध्ये नागपूर येथे भव्य मोर्चा सकाळी चाचा नेहरू पार्कपासून सुरु झाला होता. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, उपमहामंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले आहे. भारतीय मजदूर संघ नेहमीच शोषित पिडीत वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असून कामगारांना न्याय मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करणार असल्याचे गजानन गटलेवार महामंत्री भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश यांनी मोर्चाला मार्गदर्शन करताना केले आहे. संघटनेचे शिष्टमंडळाने दिलेले निवेदन मंत्री गिरीश महाजन यांचे स्विय सहाय्यक यांनी स्विकारले आहे. संघटनेचे शिष्टमंडळात अध्यक्ष निलेश खरात, अमर लोहार, सागर पवार, ईश्वर थोरात, विलास गुजरमाळे सहभागी होते. या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील हजारो कामगार सहभागी झाले होते.
