निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकासह अन्य साथीदारांवर कारवाई
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ढेकु येथे एक अब्ज सात कोटी हून अधिक एमडी नामक अमली पदार्थावर खोपोली पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करीत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकासह अन्य साथीदार यांच्यावर कारवाई करीत त्यांच्याकडून तीन किलोच्या आसपास चरस नामक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, नवी मुंबई येथील अंमली पदार्थ विरोधी पथकास रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरस नामक अमली पदार्थ यांची खरेदी विक्री तसेच बाळगण्याची माहिती खबऱ्या मार्फत प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे खात्री करीत मिळालेली माहिती सत्य आहे याची खात्री झाल्यानंतर सदर पथकाने छापा टाकत रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही इसमांना ताब्यात घेतले. घेतलेल्या संशयित इसमामध्ये एकजण रायगड पोलिस दलातील निवृत्त पोलिस कर्मचारी याचा नजिकचा नातेवाईक आहे.
काही महिन्यांपूर्वी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांची पाकिटे सापडली होती. पोलिस पथकांकडून किनारपट्टीवरील गावांमध्ये मच्छीमार, स्थानिकांशी विचारपूस करण्यात येत आहे. तपासात काही संवेदनशील माहिती समोर आली आहे. सापडलेल्या पाकिटांवर गरुड आणि नागाचे चित्र असून त्यावर ‘अफगाण प्रॉडक्ट’ असे इंग्रजीत लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रकरणाचे धागेदोरे थेट अफगाणिस्थानापर्यंत असल्याचा संशय अजूनही व्यक्त होत आहे. सागरी किनारपट्टीवरील लोकांसाठी तस्करी हा नवा विषय नाही. १९७० ते ९०च्या कालावधीत तस्करांनी धुमाकूळ घातला होता. देशात तयार न होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने-चांदीची तस्करी मोठ्या प्रमाणात व्हायची. जिल्ह्यातील दुर्गम भागातील बंदरे ही तस्करीचे साहित्य उतरण्याची मुख्य ठिकाणे होती.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटासाठी वापरलेले आरडीएक्स नामक स्फोटक तसेच हत्यारे रायगड जिल्ह्यातील शेखाडी किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. त्याच धर्तीवर श्रीवर्धन तालुक्यातील कोंडीवली, दिवेआगर, मारळ आदिसहित इतर ठिकाणी अलिबाग तालुक्यातील नागाव, आक्षी, वरसोली, मुरुड तालुक्यातील कोलई, विहूर समुद्रकिनारी अफगाण चरस या अमली पदार्थाची पाकिटे मोठ्या प्रमाणात सापडल्याने खळबळ उडाली होती. मुंबई बॉम्ब स्फोटानंतर रायगड समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. परंतु, अमली पदार्थ सापडल्याने पुन्हा सागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
समुद्रकिनारी चरस सापडल्यानंतर रायगड पोलिसांनी किनारी भागात गस्त वाढवली होती. सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथक तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर विशेष पथकांच्या मदतीने किनारपट्टीवरील गावांमध्ये शोध मोहिम सुरू केली होती. मच्छीमार सोसायट्यांच्या माध्यमातून नौका मालक, नौकांवर काम करणारे परप्रांतीय खलाशांची चौकशीही करण्यात आली. समुद्रात एखादी बोट बोट नादुरुस्त आहे का, ज्यातून अमली पदार्थाची पाकिटे फेकली असावी, याचा शोध तटरक्षक दलाकडून घेतला गेला. मात्र आजपर्यंत ही पाकिटे कुठून आली याचा तपास लावण्यात विविध विभागातील तपास यंत्रणेला अपयश आले आहे.
समुद्र किनारी अमली पदार्थाची पाकिटे बेवारस स्थितीत आढळली आहेत. काही पाकिटे भिजली आहेत. साधारण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी अंदाजे १५०० किलोग्रॅम वजनाची पाकिटे असून अमली पदार्थ विरोधी पथकाने तपास केला असता, त्यात चरस हे अमली पदार्थ असल्याचे आढळून आले होते. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई केली होती. अजूनही समुद्रातून आलेली पाकिटे ही काहींनी लपवून ठेवली असून ती आता विक्री करण्याच्या हेतूने बाहेर काढत असल्याची माहिती एका पोलिस अधिकारी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली. रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही कारवाई का होत नाही? असा सवाल सुज्ञ नागरिकांना पडला आहे.