आमदार रवीशेठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दिले निवेदन
विनायक पाटील
पेण : तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी भाजपा आमदार रवीशेठ पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून यासंदर्भात मागणी केली होती. यासंदर्भात आमदार रवीशेठ पाटील यांनी सदर मागणीचा पाठपुरावा करीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली.
पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारीत योजना गेल्या अनेक वर्षापासून प्रगतीपथावर आहे.या प्रकल्पाबाबत क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असता प्रकल्पाचे मुख्य धरणाची बहुतांश कामे पूर्ण झालेली असुन भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. धरणाची घळभरणी सन २००० सालीच पूर्ण झालेली आहे असे असताना देखील कालव्याची कामे अद्याप पर्यंत न झाल्यामुळे गेल्या २० ते २२ वर्षापासून होत असलेल्या पाणीसाठ्याचा प्रत्यक्ष लाभ लाभधारक शेतकऱ्यांना मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे असे म्हटले आहे.त्या अनुषंगाने आता प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेऊन प्रकल्प पूर्ण करावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.
प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली असता पुढील कामांचे नियोजन करण्यासाठी प्रकल्पला चतुर्थ सुधारित प्रशासरकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. सन २०२२/२३ मध्ये प्रकल्पाची तांत्रिक छाननी पूर्ण झालेली आहे. महामंडळाने प्रस्ताव माहे जानेवारी सन २०२३ मध्ये शासनास सादर केलेला आहे. प्रकल्पास सर्व वैधानिक मान्यता प्राप्त आहेत. तसेच शासन स्तरावरील तांत्रिक तपासणी देखील अंतिम टप्प्यात आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पाच्या प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आपले स्तरावरून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर हेटवणे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पेण तालुक्यातील ४५ गावे या गावांच्या ४ हजार २६८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत सुविधा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची निकड लक्षात घेता प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळात बैठकीत ठेवणे करिता आपले स्तरावरून संबंधितास निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार रवीशेठ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.