• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासु येथे बेमुदत साखळी उपोषण

ByEditor

Dec 12, 2023

शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नका -विष्णूभाई पाटील

विनायक पाटील
पेण :
शासनाकडून कोकणवासीयांवर अन्याय होत असून शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नका. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, नवीन मंजूर झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून या महामार्गावर प्रवास करताना अनेकांचे बळी गेले आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच या महामार्गावर धूळ, धुरळा याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला व इतर आजारांचा सामना करावा लागत आहे. निद्रिस्त शासन, प्रशासन आणखी किती बळी जाणार याची वाट पहात आहे. या शासनाला जागे करण्यासाठी आमच्या स्टाइलने दणका द्यावा लागेल असा इशारा विष्णुभाई पाटील यांनी कासु येथे साखळी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर बोलताना दिला.

मुंबई गोवा महामार्गाच्या परिपुर्ततेसाठी कासू येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करावे. दि १२ डिसेंबर २०२३ पासून कासू ते नागोठणे येथील रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात यावे. तो पूर्णपणे पेव्हर ब्लॉक मुक्त करावा. काम पूर्ण होई पर्यंत धुळीचे कण उडणार नाहीत याची योग्य ती दक्षता घेण्यात यावी. राष्ट्रिय महामार्ग क्र.६६ पनवेल ते इंदापूरच्या रस्ता रुंदिकरणाच्या कामात पाटणी ते आनंदनगर येथील शेतकऱ्यांच्या सुपीक शेती लगत केलेल्याभरावामुळे, शेतीचे पाणी व सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने सुपीक शेतीचे अनेक वर्षापासुन होणारे नुकसान भरपाई मिलावी, भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी ३१.१२.२०२३ पर्यंत पक्का नाला बांधून मिळावा, महामार्गावर पूर्णतः धुळीचे साम्राज्य पसरलेले असून प्रवासी व स्थानिकाना आजाराचा सामना करावा लागत आहे, यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी. जी घरे धूळ बाधित झालेली आहेत त्यांची चौकशी करून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळच्या अधिनियम अन्वये कारवाई करुन अहवाल मिळावा. आजतागायत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन जेवढे निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांना किमान २०- २५ लाख आर्थिक सहाय्य व शासकीय नोकरी देण्यात यावी.

प्रशासनाच्या दुर्लक्षितेमुळे अपघातामध्ये ज्यांनी कायमस्वरूपी अपंगत्व पत्करले आहे त्यांचा हॉस्पिटलचा सर्व खर्च व त्यांच्या पुढील खडतर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शासनाने विशेष मोहीम राबवित दत्तक घ्यावे, लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात यावे. तसेच त्वरित दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. महामार्ग होण्यास विलंब का झाला यासाठी चौकशी समिती प्रस्थापित करुन चौकशीचा अहवाल मिळावा. सदर महामार्ग पलस्पे ते झाराप पूर्ण MORTH च्या नियमानुसार जो पर्यन्त पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा टोल आकारु नये. मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघाताला शासन, प्रशासन, ठेकेदार व अडवणूक करणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असून याची सखोल चौकशी करून या सर्वावर सदोष मनुष्यवधाचा व कामात दिरंगाई केल्याबाबतचे गुन्हे दाखल करून समस्त कोकणकरांना न्याय द्यावा, पळस्पे ते कामु करण्यात आलेले काम नित्कृष्ठ दर्जाचे असून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे. या मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे सांगण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!