मिलिंद माने
महाड : मोठा गाजावाजा करून राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेला आपला दवाखाना महिनाभरातच कोमात गेला आहे. ज्या ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. शिवाय दवाखाना सुरू झाल्यापासून याठिकाणी थेंब भर पाणी देखील आलेले नाही. ज्या डॉक्टरांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती. त्या डॉक्टरांनी देखील पळ काढला असल्याने महाडमधील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. मात्र राज्यकर्ते जोमात असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

राज्यातील महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून आपला दवाखाना ही संकल्पना सुरू करून गोरगरीब जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अनेक ठिकाणी हे केंद्र सुरू करताना मोठा गाजावाजा देखील केला गेला. याचा फायदा त्या त्या परिसरातील नागरिकांना होत असला तरी महाडमध्ये मात्र महिनाभरात आपला दवाखाना कोमात गेला असून संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर गेली आहे. महाड शहरामध्ये शासनाच्या आरोग्य विभागाकडून नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील जुनी भाजी मंडई परिसरातील महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले तर दुसरे केंद्र शहरातील काजळपुरा भागात सामाजिक सभागृहामध्ये मंजूर झाले आहे. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन . मोठ्या थाटामाटात व गाजावाजा करून झाले असले तरी काजळपुरा भागातील केंद्र सभागृहाच्या कामासाठी आजपर्यंत सुरू झालेले नाही.

महाड शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या महाड नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामधील केंद्र महिनाभरातच कोमात गेले आहे. ज्या ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे त्याठिकाणी केंद्र सुरू झाल्यापासून नळाला थेंबभर पाणीच आलेले नाही. या ठिकाणी रुग्ण तपासणी बरोबरच विविध प्रकारच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या देखील केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे पाणी आवश्यक आहे. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांना बादली भरून बाहेरून पाणी आणावे लागत आहे. येथे असलेल्या स्वच्छतागृहांना देखील पाणी नसल्याने रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. या ठिकाणी उद्घाटन करण्याच्या वेळेस वीज पुरवठा करण्यात आला होता मात्र, अवघ्या दोन दिवसातच हा वीज पुरवठा खंडित झाला आहे. आपला दवाखाना या आरोग्य व्यवस्थेचे उद्घाटन झाल्यापासून या ठिकाणी वीज व्यवस्था नसल्याने लॅब तपासणीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

महाड बाजारपेठेत सुरू झालेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये दोन वैद्यकीय डॉक्टर, एम.पी.डब्ल्यू, ए. एन.एम., सुरक्षा रक्षक, एक नर्स अशी एकूण पाच पदे नियुक्त करण्यात आली होती. मात्र येथे रुजू झालेले डॉक्टर अवघ्या महिन्याभरात हे केंद्र सोडून आपल्या मूळ गावी रुजू झाल्याचे सांगण्यात आले. 11 महिन्याचा करार असताना देखील डॉक्टरांना दुसरे पर्यायी वैद्यकीय अधिकारी येण्यापूर्वीच या डॉक्टरांना सोडण्यात आले आणि त्याच पदावर त्यांच्या गावी नियुक्ती कशी देण्यात आली हा एक प्रश्नच आहे. मात्र, कंत्राटी करारनाम्यात तशी सूट असल्याचे महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बावडेकर यांनी सांगितले.
महाड शहरातील नगरपालिकेच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये सद्यस्थितीत या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे आपला दवाखाना ओस पडला आहे. केवळ लॅब तपासणी सुरू असली तरी या ठिकाणी पाणी आणि वीज नसल्याने ही सेवा देखील ठप्प झाली आहे. तर शहरातील दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या काजळपुरा भागात ज्या ठिकाणी हे आरोग्य वर्धिनी सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्या ठिकाणी सभागृहाचे काम सुरू असल्याने अद्याप हे केंद्र सुरू झालेले नाही. यामुळे गाजावाजा करून सुरू झालेला आपला दवाखाना अल्पावधीतच कोमात गेला आहे.
महाडमध्ये सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना यामध्ये रुजू झालेले डॉक्टर त्यांच्या मूळ गावी गेल्याने दुसरा डॉक्टर मिळावा याकरिता पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-डॉ. नितीन बावडेकर
महाड तालुका आरोग्य अधिकारी
महाड शहरातील आपला दवाखाना ही संकल्पना राज्यातील महायुती सरकारने चालू केली असली तरी ती केवळ दोन महिन्यातच कोमात गेल्याने संपूर्ण आरोग्य व्यवस्था सलाईनवर गेल्याचे चित्र या निमित्ताने पाहण्यास मिळत आहे. मात्र, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी असणारे कर्मचारी कोणतेही ठोस उत्तर देऊ शकत नसल्याने गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असताना राज्यकर्ते मात्र आपल्या आलिशान गाड्यांमध्ये फिरून जनतेला कोणता संदेश देत आहेत असा प्रश्न या ठिकाणी तपासणीसाठी आलेल्या दोन रुग्णांनी आपली नावं न सांगण्याच्या अटीवर उपस्थित केला. गोरगरीब रुग्णांना द्यावयाच्या आरोग्य सुविधा देखील हे देऊ शकत नसतील तर यांना मतदान करताना आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल असे संतापजनक उत्तर त्या व्यक्तींनी दिले. |