विद्यापीठ बंद होण्याच्या मार्गावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांचा आरोप
सलीम शेख
माणगाव : लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ गेले अनेक दिवसापासून विविध समस्यांना तोंड देत आहे. याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी अक्षम्य दुर्लक्ष चालवले असून हे विद्यापीठ बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शिवसेना द. रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी प्रसार माध्यमांशी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ पटांगणात शासन आपल्या दारी हा शासनाचा उपक्रम घेण्यात येणार असून त्या जागेची पाहणी व नियोजन करण्यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत हे ता. १६ डिसेंबर शनिवारी विद्यापीठात येणार असून त्यावेळी आपण सविस्तर निवेदन देवून लक्ष वेधणार आहोत असे घोसाळकर यांनी म्हटले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या आदेशाने ता. ३० मार्च २०२३ रोजी इंस्ट्रीटयुट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग विदयापीठात विलीनिकरण झाले आहे. शासन ज्ञापन निर्गमीत होऊन ९ महिने इतका कालावधी होऊन प्रशासकीय तसेच लेखा विषयक एकत्रित कामकाजाबाबत कोणताही ठोस निर्णय कुलगुरु व कुलसचिव घेत नाही. इन्स्टुटयुटचे नॉन टिचींग जवळ जवळ २० कर्मचारी परमनंट आहेत. ते सर्व कर्मचारी ९ महिने काही काम न करता फुकट लाखो रुपयाचा पगार दरमहा घेत असुन विदयापीठाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कुलसचिव कार्यालयात ४ कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्या ठिकाणी १० कर्मचारी काम करतात. एवढ्या कर्मचाऱ्यांची गरज नाही. नियमित प्राध्यापकांच्या व काही कर्मचाऱ्यांच्या पत्नी व नातेवाईक यांच्या नेमणुका प्रत्येक वर्षी सातत्याने तात्पुरत्या स्वरुपात स्थानिकांना डावलून होत आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या घरातील दोन-दोन नातेवाईक कामावर घेतलेले आहेत. स्थानिकांना डावलून विदयापीठाची आर्थिक लुट केली जात आहे. अस्तीत्वात नसलेली पदे निर्माण करुन मर्जितल्या लोकांची स्वतःच्या फायदयासाठी खोगीर भरती केली आहे. नविन वसतिगृहे दोन वर्षापासुन बांधुन सुसज्ज स्थितीत असुन ती बंद आहेत. विदयार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जात नाही. विदयापीठात कसल्याही प्रकारचे शैक्षणिक कामकाज होत नसुन मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असुन विदयापीठाचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावला आहे. कुलगुरु यांची नेमणूक होऊन दोन वर्षे झाली. त्यावेळीपासून त्यांची प्रत्यक्षात उपस्थिती नगण्य आहे. त्यामुळे विदयापीठात कोणतेही धोरणात्मक निर्णय होत नाहीत. विद्यापीठात कंपन्यांचे कॅम्प मोठ्या प्रमाणात होत नसल्याने विदयार्थ्यांचा अॅडमिशन घेण्याकडे कल कमी झालेला आहे.
विदयापीठाच्या या दयनीय अवस्थेमुळे स्थानिकांमध्ये फार नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चाळके यांनी देखील विदयापीठाची स्थिती सुधारण्याबाबत वारंवार चर्चा केलेली आहे. मात्र विदयापीठाकडुन दुर्लक्ष केले जात असून अशाच प्रकारे विदयापीठाची वाटचाल सुरु राहिल्यास विदयापीठ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. बॅ. अंतुले यांचे सहकार्याने लोणेरे मध्ये महाराष्ट्राचे विदयापीठ झाले. विदयापीठाला शासनाने पाच गावांची मिळून ४६६ एकर जमीन अत्यंत अल्प मोबदल्यात म्हणजे १० हजार रुपये एकरी शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा विरोध असुन शैक्षणिक भव्य संकुल होत असल्याने आमचे सहकार्याने जमीनी संपादीत करुन दिल्या. ता. ५ मे १९८६ रोजी विदयापीठ सुरु झाले. विदयापीठ सुरु होऊन ३७ वर्षे झाली. सुरुवातीने प्रथम कुलगुरु कै. देशपांडे यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरुवात केली व विदयापीठाचा दर्जा उच्च ठेवला होता. महाराष्ट्रात बाटुचा विदयार्थी म्हणून अनेक कंपन्यांनी गौरविले व विदयार्थ्यांना चांगली नोकरीची संधी मिळाली. ॲडमिशनसाठी देशपातळीवर विदयार्थी यायचे. सद्य स्थितीत कुलगुरु व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ॲडमिशन होत नाहीत. असेही प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.