• वर्षाच्या शेवट महीन्यात पर्यटकांची रेलचेल सुरू
• नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला मोठी पसंती मिळत आहे. प्रत्येक विकेंडला होणारी पर्यटकांची रेलचेल या वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात कायम दिसून आली. यापुढे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही गर्दी नववर्षाच्या स्वागतासाठी अशीच कायम राहणार असल्याचे येथील व्यवसायिक सांगत आहेत.
दिवेआगर किनाऱ्यावर आतापर्यंत सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे. कारण येथे लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा व पुरातन मंदिरांचे वैशिष्टतेमुळे फिरण्यासाठी निघालेल्या पर्यटकांना येथील निसर्गसौंदर्याने भुरळ पाडलीय. येथील धार्मिक व पर्यटन स्थळांना वाढती गर्दी पाहायला मिळत आहे.

दिवेआगर समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टस्चा आनंद पर्यटक घेत आहेत. कोंकणातील सुंदर वातावरण मुळे इथून पाय निघत नाही असे पर्यटक सांगतात. गुलाबी थंडीचा सायंकाळी तासनतास आनंद घ्यावा यासाठी पर्यटक समुद्रकिनारी येऊ लागलेत. आता पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत.
पर्यटकांच्या वर्दळीने चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठय़ा हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला येथील समुद्र किनारी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. यावेळी हि तितकीच गर्दी होणार असल्याचे बुकिंग वरून समजते.
सर्वसामान्य अपेक्षा पूर्ण व्हाव्या
दिवेआगर पर्यटन वाढायचे असल्यास काही मुलभूत सोयी लोकप्रतिनिधींनी पुरवण्याची गरज या निमित्ताने पुढे येऊ लागली आहे. येथील समुद्र किनारे सुरक्षित आहेत. तसेच ते नेहमीच स्वच्छ दिसत असल्याने किनाऱ्यावर येणाऱ्या बाहेरील पर्यटकांना समुद्रस्नान करण्याचा मोह आवरता येत नाही. किनाऱ्यावर बसून समुद्र न्याहाळण्यासाठी बैठका, विविध शिल्प कलेचे आकर्षण, पथदिव्यांची रोषणाई अशा विविधतेने सुशोभीकरण व्हावे. अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.