एक हेक्टर भूखंडावरील मियावाकी प्रकल्प अधांतरीच; लागवडी अभावी हजारो रोपे करपली
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला समुद्रकिनाऱ्यालगत वृक्ष लागवडीने हिरवेगार करणारे मियावाकी प्रकल्प गेल्या सात महिन्यांपूर्वी सुरू होऊन बंद झाला आहे. या बंद प्रकल्पामुळे सहा हजार झाडांची रोपे करपली आहेत.
दिवेआगर हे प्रसिध्द पर्यटन व धार्मिक स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. त्यामुळे येथे मानवनिर्मित जंगल तयार करून वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी मियावाकी पद्धतीची योजना राबविण्यात येत आहे. कमी जागेत घनदाट जंगल उभारण्यात येणाऱ्या पद्धतीलाच मियावाकी प्रकल्प बोलले जात आहे. यासाठी सामाजिक वनीकरणने मियावाकी प्रकल्पातून लागवड होण्यासाठी जागेची मागणी दिवेआगर ग्रामपंचायतकडे केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतकडून २०२१ मध्ये साधारणपणे पंचावन्न गुंठे जागाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, जून २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेला प्रकल्प आता सात महिने उलटून गेले तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने आणलेली रोपटी देखील वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.

जांभूळ, आवळा, पेरू, सीताफळ, काजू, करंज, कांचन, कडीपत्ता, पिपरन आणि कळंब इत्यादी मिश्र कलमांची लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या काही वर्षांपासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे. यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने जपानी पद्धतीचे “मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते. यामध्ये विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. वाढीसाठी लागणाऱ्या ऊन, पाण्यासाठी ती झाडे एकमेकांशी स्पर्धा करणार नाही. त्यामुळे सर्वच झाडांची चांगली वाढ होऊन घनदाट जंगल तयार होते. दिवेआगर येथे पाच ते दहा हजार लागवड अपॆक्षित आहेत. मात्र, प्रस्तावित प्रकल्प अद्याप अधांतरीच राहिल्याने आता हजारो रोपटे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.
शासनाकडून निधी न आल्याने काम रखडले. निधी प्राप्तीनंतर लागवडीचे काम सुरू होईल.
-भीमराव सूर्यतल, वनरक्षक
वृक्ष लागवडीसाठी शासन सर्व स्तरावर काम करते. मात्र, या प्रकल्पासाठी भूखंडाचे सपाटीकरण करण्यात आले. लागवडीसाठी हजारो रोपे घेण्यात आली. एवढा खर्च होऊन सुद्धा दुर्लक्ष का होत आहे?
-देवेंद्र नार्वेकर,
कांदळवन समिती सदस्य