वर्षाच्या अखेरीस माथेरानमध्ये पुन्हा धावणार ई-रिक्षा
गणेश पवार
कर्जत : थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेले माथेरान पुन्हा पर्यटकांनी बहरलेले दिसणार असल्याचे संकेत सध्या दिसत असून मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार राज्य शासनाकडून ई-रिक्षाचा पथदर्शी प्रकल्प पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या अखेरीस सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर माथेरान नगरपरिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत.
काही दिवसांवर नाताळ पर्यटन हंगाम येऊन ठेपला असताना ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत असलेले शालेय विद्यार्थी तसेच वयोवृद्ध नागरिक, पर्यटकांची सुरक्षित व वाजवी दळणवाळणासाठी होणारी फरफड आता कायमस्वरूपी थांबणार असल्याचे संकेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे लेखी आदेश 8 डिसें. रोजीच्या पत्राद्वारे माथेरानचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना दिल्याने येथे लवकरच ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट काही दिवसात सुरु होण्याची चिन्ह दिसत असून ई-रिक्षाच्या नियोजनासंदर्भात बैठकांचा सपाटा देखील सुरु असल्याने माथेरानकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मा .सर्वोच्च न्यायालयाने दि. 22 नोव्हेंबर रोजी ई- रिक्षाचा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण माथेरान शहरात सुरू करण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला. यासंदर्भात मध्यंतरी श्रमिक हात रिक्षा चालक-मालक संघटनेने नुकतेच नियुक्ती झालेले माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन ई-रिक्षा आमच्या हात रिक्षा चालकांनाच चालविण्यास द्याव्यात अशा प्रकारची मागणी केली होती. तसेच ई-रिक्षा लवकरात लवकर सुरु करण्यासाठी दिव्यांग, विद्यार्थी, पालक वर्ग तसेच वयोवृद्ध नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी देखील निवेदन देऊन नगरपरिषदेचे लक्ष वेधले होते.
याच धर्तीवर ज्या श्रमिक हात रिक्षा चालक-मालक संघटनेची मागणी होती. त्या हात रिक्षा चालकांना विश्वासात घेऊन मुख्याधिकारी इंगळे यांनी दि. 22 रोजी माथेरान नगरपरिषदेच्या दालनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर प्रकल्प आम्ही येत्या दोन तीन दिवसात सुरू करत असून या ई-रिक्षांच्या संख्या वाढवण्याबाबत आपली रास्त मागणी सनियंत्रण समिती तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनात राज्य शासनाच्या वकिलांमार्फत आणली जाईल अशी ग्वाही देत पुढील आदेश येईपर्यंत सदर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संघटनेची मदत अपेक्षित असून माथेरानकरांची दळणवळणा संदर्भात होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सहकार्य करावे असे देखील आवाहन केले आहे.