• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये मनुस्मृती दहन स्मृती दिन साजरा

ByEditor

Dec 25, 2023

फुकट देण्याचे आश्वासन म्हणजे गुलाम बनवण्याचे लक्षण -आनंदराज आंबेडकर

मिलिंद माने
महाड :
महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती. या दिनाचा ९६वा स्मृतिदिन आज महाडमध्ये साजरा झाला. बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्यावतीने महाड क्रांतीस्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना देशात पुन्हा मनुवादी सरकार जनतेला फुकट देण्याचे आश्वासन देवून भावी पिढीला गुलाम करत आहे. यापासून वाचवायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून सन्मानाने जगायला शिकले पाहिजे असे मत व्यक्त केले.

महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ साली मनु रचित मनुस्मृती हा ग्रंथ जाळून टाकला. या ग्रंथाने समाजातील तळागाळातील समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले होते. शिवाय महिलांवर अन्याय होईल अशा प्रकारे बंधने घालण्यात आली होती. या मनुस्मृती दहन दिनाचा ९६ वा स्मृतिदिन आज साजरा करण्यात आला. वंचित विकास महिला मंडळाच्या डॉ. प्रमिला संपत या गेली २० वर्षापासून महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करत आहेत. यामुळे आज महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रमिला संपत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी महाड शहरातून घोषणा देत क्रांतीस्तंभ गाठले.

बौद्धजन पंचायत समितीकडून देखील क्रांतिभूमीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचारपीठावर बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी आपले विचार मांडताना डॉ. बाबासाहेबांनी समाजामध्ये वावरताना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली, मात्र स्वाभिमान गहाण ठेवून अनेक जण आपला स्वार्थ साधत आहेत अशा शब्दात नाव न घेता केंद्रीय मंत्री आठवले यांच्यावर सडेतोड टीका केली. देशात असलेल्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यामुळे नागरिकांनी जागरूक झाले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून समाजाला यातून वाचवलं पाहिजे असे आवाहन देखील केले. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांवर नाराजी देखील व्यक्त केली मनुस्मृती दहन दिन आणि चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन या दोन्ही कार्यक्रमांना स्थानिक भूमिपुत्रांची उपस्थिती कमी असते हे प्रकर्षाने जाणवते असे सांगितले.

आपल्या भाषणात प्रा. प्रमिला संपत यांनी देखील स्थानिकांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त करत विदर्भात ही भूमी असती तर आगळा वेगळा कार्यक्रम झाला असता असे सांगितले. बाबासाहेबांचा विचार हा बॅनरबाजीतून नव्हे तर कृती आणि वागणुकीतून व्यक्त झाला पाहिजे असे स्पष्ट केले. जगात जिथे जाल तिथे बाबासाहेब दिसतील त्यामुळे ते केवळ भारतरत्न नाहीत तर ते विश्वरत्न आहेत. बाबासाहेब डोक्यात घेतला पाहिजे. आम्ही मात्र मनोरंजन आणि भौतिक सुखात गुंतलो गेलो आहोत. आम्ही विचाराने मोठे झालो नाही अशी खंत देखील व्यक्त केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!