• स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि सहलीसाठी येणाऱ्या विद्यार्थिनींचे हाल
• रायगड विकासाच्या नावाखाली रायगड प्राधिकरणाने निकृष्ट दर्जाची कामे करून केला बट्ट्याबोळ?
मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यास आता शैक्षणिक सहलींची गर्दी वाढू लागली आहे. प्रतिदिन जवळपास तीस ते चाळीस शैक्षणिक सहलींच्या गाड्या रायगडावर दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे सलग सुट्ट्या आणि शनिवार रविवार या दोन दिवशी शिवप्रेमी, हजारो पर्यटक मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. मात्र येथील सोयीसुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे व महिला वर्गाचे व विद्यार्थिनींचे प्रचंड हाल होत आहेत. राहण्यासाठी असुविधा, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने महिला आणि मुलींचे हाल होत आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली बट्ट्याबोळ करून रायगड प्राधिकरण डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प बसले आहे.

हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचे स्थळ असलेल्या किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील काही वर्षापासुन लक्षणिय वाढ झाली आहे. दिवसेंदिवस पर्यटकांबरोबर शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासहित देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. रायगडचे असलेले महत्त्व पाहून राज्य शासनाने किल्ले रायगडचा परिसर आणि गड विकसीत करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून हाती घेतला आहे. यासाठी ६०० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. छत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर प्राथमिक स्वरुपात जरी कामे सुरु करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात गडावर आणि गडाच्या परिसरामध्ये गडावर येणाऱ्या पर्यटकांना व गड पाहण्यासाठी येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याने शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन किल्ले रायगड आणि सभोवतालच्या परिसरामध्ये असंख्य अडचणी असताना शासनाला त्या सोडविण्यात पुर्णपणे अपयश आल्यामुळे राज्यभरांतुन येणाऱ्या लाखो पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ सहलींचा असतो. या दरम्यान किल्ले रायगडवर शैक्षणिक सहली आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. दिवसाला किमान तीस ते चाळीस मोठ्या बसेस किल्ले रायगड पाह्ण्यासाठी दाखल होत आहेत. अनेक जण रोप वेचा तर अनेक जण पायी जाण्याचा पर्याय निवडतात. यामुळे आधीच अरुंद असलेल्या पायथ्याच्या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवला आहे. याठिकाणी दोन्ही बाजूला मोठी वाहने आणि छोट्या कार पार्क केल्या जात असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे दैनंदिन एसटीच्या गाड्यांना या वाहन कोंडीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रायगड पाहण्यासाठी गेलेले विद्यार्थी किंवा पर्यटक हे गाड्या पार्किंगला लाऊन किल्ल्यावर जात असल्याने त्या बाजूला करणे कठीण असते. पूर्ण दिवस या गाड्या एकाच जागी उभ्या राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याकरिता स्थानिक पोलीस कर्मचारी वाहतूक नियोजन करण्यासाठी असणे गरजेचे आहे. किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणच्या माध्यामातून करोडो रुपये दुरुस्ती व नवीन कामाच्या नावाखाली इतर कामांवर खर्ची घातले जात आहेत. मात्र, मुलभूत सोयीसुविधांकडे अद्याप दुर्लक्ष केले जात आहे. मागील पाच वर्षापासून रायगड प्राधिकरण याठिकाणी काम करत आहे. गडावर पाण्याचा थेंब नसल्याने येणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा गेली अनेक वर्षापासून केली जाते. मात्र तलाव दुरुस्ती, नळ जोडण्या आदी कामासाठी विलंब लागत असल्याने प्रतिदिन हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना पिण्याचे पाणी मात्र आज देखिल विकतच घ्यावे लागत आहे. चित्त दरवाजामध्ये देखील पाण्याची सुविधा नसल्याने या मार्गे पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांचे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय गडावर आणि परिसरात नसल्याने बांधण्यात आलेले स्वच्छतागृह तसेच पडून आहेत. जिजामाता समाधी स्थळ, किल्ले रायगड आदी ठिकाणी हे स्वच्छतागृह उभे केले असले तरी पाण्याअभावी महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक व्यवसायिक मात्र पाणी नसल्याने स्वच्छतागृहाचा वापर करण्यास पैसे उकळत आहेत.
धर्मशाळा दुरुस्ती झाली तरी बंदच?
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली धर्मशाळा आहे. या धर्मशाळेची दुरवस्था झाल्याने रायगड प्राधिकरणच्या माध्यामतून धर्मशाळेची दुरुस्ती करण्यात आली. पूर्वीच्या जुन्या धर्म शाळेवर केवळ डागडुजी करण्यात ती नवीन बांधल्याच्या आव आणून रायगड प्राधिकरणाच्या शाखा अभियंत्याने यावरती ठेकेदाराच्या संगनमताने लाखो रुपयांची उधळपट्टी केली मात्र अद्याप हि धर्मशाळा पर्यटक किंवा विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. देखरेख करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने आणि याठिकाणी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाला पाणी नाही. शैक्षणिक सहलींना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. धर्मशाळेला प्रशस्त हॉल आणि सहा छोटे रूम आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छता नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील स्वच्छतागृह देखील नादुरुस्त झाली असून याठिकाणी देखील पाण्याची सुविधा उपलब्ध नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हि स्वछता आणि दुरुस्ती केल्यास नाममात्र भाडे घेऊन शैक्षणिक सहलींना उपलब्ध करून दिल्यास. देशासह राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांचे व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सोयीसुविधानाअभावी होणारे हाल थांबणार आहेत. मात्र याचे सोयरसुतक ना राज्य सरकारला रायगड प्राधिकरणाला ना केंद्र सरकारला ना रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व जण डोळ्यावर काळी पट्टी बांधून रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांचे व हजारो पर्यटकांच्या सोयी सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची ओरड पर्यटकांमधून दररोज रायगडावर ऐकण्यास मिळत आहे.