आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश; १३ कोटींची तत्वतः मान्यता
सलीम शेख
माणगाव : निजामपूर जिल्हापरिषद गटातील कडापे, निजामपूर, कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे विळे-भागाड एमआयडीसीतील दूषित पाण्याच्या विसर्गामुळे वर्षानुवर्षे बाधित होती. शासन दरबारी प्रयत्न करून देखील न्याय मिळत नव्हता परंतु, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते, आमदारभरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने मंगळवार, दि. २० जुन २०२३ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार भरतशेठ गोगावले यांनी उदय सामंत यांना संपूर्ण परिस्थितिची माहिती सादर करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एमआयडीसीच्या दूषित पाण्यामुळे बाधित असणाऱ्या कडापे ग्रामपंचायत निजामपूर ग्रामपंचायत, कोस्ते खुर्द ग्रामपंचायत या गावांना एक टीएमसी पाणी उपलब्ध करून त्यास आवश्यक असणाऱ्या पाणी पुरवठा जलवाहिन्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद करून संबंधित ग्रामपंचायत व आजूबाजूला असणाऱ्या गावांना त्वरित पाणी पुरवठ्याची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उद्योग मंत्री यांच्या आदेशानुसार देण्यात आले.
या बैठकीत महाड शहराला देखील पाण्याचा तुटवडा भासत असल्यामुळे महाड एमआयडीसी अंतर्गत पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते. शिवसेना माणगाव उप तालुकाप्रमुख नितीन पवार, विभागप्रमुख मनोज सावंत, निजामपूर ग्रामपंचायत सरपंच राजाभाऊ रणपिसे, गणेश समेळ, प्रसाद गुरव, मंगेश खराडे, कासार गुरुजी, बाळाराम दबडे, रमेश दबडे, प्रकाश महाडिक, सचिन मोरे, सुरेंद्र पालांडे, सर्व शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.