केंद्र सरकारच्या जाचक वाहन नियमा विरोधात वाहन चालक मालक संघ रस्त्यावर उतरणार
किरण लाड
नागोठणे : केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात वाहन चालकाला दहा वर्षाची सजा व सात लाखाचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वाहन नियमाच्या विरोधात वाहन चालक मालक सामाजिक संघ ३ जानेवारीला नागोठण्यात चक्का जाम आंदोलन करणार आहेत.
केंद्र सरकारने जुन्या वाहन नियमात सुधारणा केली आहे. जर एखाद्या वाहन चालकाने रस्त्यावर वाहन चालविताना अपघात केला आणि अपघातग्रस्त व्यक्तीला तेथेच सोडून पोलीस प्रशासनाला न कळविता पळून गेला तर नवीन मोटार कायद्यानुसार अपघात करणाऱ्या वाहनचालकाला दहा वर्षाचा कारावास व सात लाखाचा दंड ठोठावण्याचा नवीन वाहन नियम केला आहे. हा नियम ट्रक, बस, चार चाकी खाजगी वाहने यांनाही लागू आहे. या नियमाबाबत वाहन चालक, मालक संघटनेचे म्हणणे आहे कि, कोणताही वाहन चालक ठरवून अपघात करीत नसतो. जर काही कारणांमुळे अपघात झाला तर अपघातस्थळी जमावाचा उद्रेक होतो, जमाव दगड फेक करतो, प्रसंगी वाहन पेटवून देतो, रागाच्या भरात चालकांना मारहाण करतो, अशा वेळी वाहन चालकाला त्या घटनास्थळावरून गाडी सोडून पळून जावे लागते. जर अशा प्रसंगात नवीन वाहन कायद्यानूसार चालकाला दहा वर्षाची शिक्षा झाली तर त्याच्या कुटुंबाची वाताहात होवून त्याचे सर्व कुटुंब रस्त्यावर येईल. मग त्यांच्या कुटुंबाने काय करावे, हा ही प्रश्न चालक मालक संघाने उपस्थित केला आहे.
तरी नवीन वाहन नियमाबाबत केंद्र सरकारने फेरविचार करावा यासाठी वाहन चालक मालक संघाने येत्या ३ जानेवारीला दुपारी ४ वाजता नागोठणे येथे चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र संघटनेने नागोठणे पोलीस प्रशासनाला दिले आहे.