• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भंगार व्यावसायिकांमुळे उरणवासियांचा कोंडतोय श्‍वास!

ByEditor

Jan 3, 2024

अनधिकृत भंगार माफियांना शासकीय यंत्रणेचे पाठबळ

घनःश्याम कडू
उरण :
भंगार व्यावसायिकांकडून पेटवल्या जाणार्‍या वायरी, टायर यासह इतर विद्युत उपकरणांमुळे उरण शहरात व तालुक्यात धुरांचे लोट पसरत आहेत. रहिवासी भागात तसेच मोकळ्या जागेत चालणार्‍या या प्रकारामुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. त्यानंतरही शहरातील व तालुक्यातील प्रदूषणात भर टाकणार्‍या भंगार व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी अनधिकृत भंगार गोदामाला भीषण आग लागण्याची घटना घडूनही शासकीय यंत्रणा याबाबत कोणतीच खबरदारी घेताना दिसत नाही. यावरून शासकीय यंत्रणेला उरणच्या जनतेचे सोयरसुतक नसल्याचे उघड होते.

मागील काही महिन्यांपासून उरणच्या प्रदूषणाची पातळी घसरत चालली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात ठिकठिकाणी उग्र वास येण्याचे, डोळे जळजळ होण्याचेही प्रकार घडले होते. यानंतरही उरणच्या प्रदूषणात सुधारणा करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून उरण शहरात व तालुक्यातील प्रत्येक गावात भंगार माफियांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून शासकीय जागेवरच बेकायदेशीर बस्तान बसविले आहे. त्यातील अनेकजणांवर तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांची कोणतीही तपासणी केली जात नसल्याने त्यांचे वास्तव्यही बेकायदेशीर ठरत आहे. याची कोणतेही दखल शासकीय यंत्रणा घेताना दिसत नाही. याचा अर्थ त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या भंगार व्यावसायिकांकडून टायर, वायर तसेच इतर विद्युत उपकरणे जाळण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यामधील धातू मिळवण्यासाठी रबरचे आवरण असलेले हे साहित्य जाळले जाते. मात्र, यामुळे मोठ्या प्रमाणात धूर व उग्र वास परिसरात पसरत असतो. अशाच प्रकारे उरण शहरातील बोरी नाका, द्रोणागिरी नोड व तालुक्यातील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी लोकवस्तीला लागून व मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत.
रात्र होताच त्यांच्याकडून दिवसभर जमा झालेल्या वायरी, विद्युत उपकरणे पेटवून त्यामधील धातू काढण्याचे काम केले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात टायर जाळले जातात. रहिवासी भागात ड्रम मध्येच टायर पेटवून हा प्रकार चालतो. त्यामुळे संध्याकाळ होऊ लागताच ठिकठिकाणी नागरिकांना उग्र वासाला व धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात वृद्ध व्यक्ती व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे. तर सततच्या उग्र वास व धुरामुळे काहींना श्‍वसनाचे त्रास देखील होऊ लागले आहेत. परंतु, उघडपणे हा प्रकार चालत असतानाही स्थानिक प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेही त्याकडे लक्ष जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सुस्त प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. भंगार व्यावसायिक टायर व इतर उपकरणे जाळत असल्याने त्याचा धूर रहिवाशी भागावर पसरत आहे. यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत असून सातत्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. वेळीच हा प्रकार न थांबल्यास प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

-राकेश पाटील,
सामाजिक कार्यकर्ता

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!