• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी ७०० एसटी बसेस आरक्षित!

ByEditor

Jan 3, 2024

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण जनतेवर येणार पायी वारीची वेळ

मिलिंद माने
महाड :
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातल्या नऊ आगारांमधून ७०० एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत. यामुळे एसटी बसेसचा तुटवडा जाणवणार असल्याने पंधरा तालुक्यातील प्रवाशांना ५ जानेवारी रोजी पायी वारी करण्याची वेळ येणार आहे.

माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातून एक लक्ष जनता उपस्थित राहण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करण्याचे धोरण राज्य शासनाने ठरविले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, माणगाव, महाड, पोलादपूर, रोह, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा व उरण या पंधरा तालुक्यातून जनता आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या रिकाम्या बसेस ४ जानेवारी रोजी म्हणजे आदल्या दिवशीच गावात वस्तीसाठी पाठवल्या जाणार आहेत. ५ जानेवारी रोजी पहाटे चार वाजल्यापासून नागरिकांना घेऊन या बसेस लोणेरे येथे निघणार आहे

रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातून नागरिक या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी जिल्ह्यातील अलिबाग, पेण पनवेल, कर्जत, माणगाव, महाड, रोहा, व मुरुड आणि श्रीवर्धन या नऊ आगारातून. सातशे बशेष या कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील नऊ आगारातून 15 तालुक्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसेस सुटणार नसल्याने ग्रामीण जनतेला पायी वारी करीत घरी पोहोचावे लागणार आहे.

डिझेलचा तुटवडा?
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या तब्बल 700 बसेस वापरण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक आगारातून सुटणाऱ्या एसटी बससाठी प्रत्येक एसटी बसला दीडशे लिटर डिझेल द्यावे लागणार आहे. मात्र, केंद्र शासनाच्या हिट अँड रन कायद्याविरोधात डिझेल टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानंतर संपूर्ण राज्यात डिझेल पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक आगारात एसटीसाठी डिझेल नाही. त्यामुळे ७०० बसेस प्रत्येकी दीडशे लिटर डिझेल कुठून आणणार? असा मोठा प्रश्न एसटी महामंडळाच्या नऊ आगारातील आगार व्यवस्थापकांसमोर उभा राहिला आहे. रायगड जिल्ह्यातील नऊ आगारातून या कार्यक्रमासाठी पाठवण्यात येणाऱ्या ज्या काही एसटी बसेस आगारात नादुरुस्त आहेत त्यांची दुरुस्ती करण्याचे काम प्रत्येक आगारात युद्धपातळीवर चालू आहे मात्र रायगड जिल्ह्यात 700 एसटी बसेस उपलब्ध झाल्या नाहीत तर बाजूच्या जिल्ह्यातील आगारातून या बसेस मागवण्याचे फर्मान राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहे मात्र या बसेस रायगड मध्ये पाठवायच्या झाल्यास त्यांना डिझेल कुठून देणार? हा प्रत्येक जिल्ह्यातील आगार व्यवस्थापकांना मोठा प्रश्न पडला आहे.

शासन आपल्या दारी जनतेची होणार पायी वारी?

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ७०० बसेस कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मात्र लोणेरे फाटा ते लोणेरे विद्यापीठ (कार्यक्रमाचे नियोजित स्थळ) हे अंतर तीन किलोमीटर असून या ठिकाणी जाणारा रस्ता अरुंद असल्याने व या मार्गावरूनच या कार्यक्रमासाठी जाणारे राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, राज्य शासनाचे सचिव व प्रशासकीय अधिकारी तसेच येणाऱ्या व्हीआयपीसाठी असणारा पोलीस बंदोबस्त व सुरक्षारक्षक यांची देखील वाहने याच रस्त्यावरून जाणार असल्याने या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता एसटी बसेस मधील नागरिकांना लोणेरे फाटा येथून कार्यक्रम स्थळी पायी वारी करावी लागणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!