पालक वर्गात संतापाची लाट; कारवाईची मागणी
महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असा सवाल आता पालक वर्ग विचारू लागला आहे. वरून’ जरी आदेश आलेला असला तरी याला विरोध का केला नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत. |
घन:श्याम कडू
उरण : बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा पुळका उरणमधील एनएआय शाळेला आलाय. चक्क आसाराम बापूची पुस्तके विद्यार्थ्यांना वाटून त्यावर परीक्षा घेऊन हजारो रुपयांची बक्षिसे देण्याचे आमिष मुलांना दाखविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आसाराम बापूविषयी अभ्यास करायला लावून मुलांवर कोणते संस्कार शाळेला करायचे आहेत? असा प्रश्न उपस्थित होतोय.
बलात्काराच्या गुन्ह्यासाठी आजन्म कारावास भोगत असलेल्या आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ नावाचे पुस्तक उरण येथील ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’च्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाटून त्यावर आधारित परीक्षा घेणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ह्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना आसाराम बापूचे ‘संस्कार सरिता’ हे पुस्तक देण्यात आले होते आणि त्यावर आधारित इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येऊन हजारो रुपयांच्या बक्षीशांची खिरापत वाटली जाणार होती.
यासाठी तीन वयोगट ठरविण्यात आले होते. जो विद्यार्थी ६० टक्के प्राप्त करेल त्याची जिल्हास्तरीय निवड होणार असल्याचे सांगण्यात आले होते आणि जिल्हास्तरीय टॉपमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड करून, प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला २१ हजार, द्वितीय येणाऱ्यास १५ हजार, तृतीय क्रमांकास ११ हजार, चतुर्थ क्रमांकास सात हजार, पाचव्या क्रमांकास ५ हजार, सहाव्या क्रमांकास ३ हजार अशी पुरस्कारांसाठीची रक्कम ठरवलेली होती. मात्र, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ह्या शाळेत सेमी इंग्लिशमध्ये शिकणाऱ्या इयता तिसरीच्या विद्यार्थीनीच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी लगोलग शाळेशी संपर्क साधला. मुख्याध्यापिका यांना भेटून चर्चा केली. त्यावर वरून आदेश आहेत, मी काहीही करू शकत नाही, असे उत्तर मुख्याध्यापिका यांच्याकडून देण्यात आल्याचं पालकांनी सांगितलं.
मुख्याध्यापिकांच्या या उत्तरानंतर पालकांनी निराश न होता पुन्हा शाळेच्या दादर येथील संस्थेशी संपर्क केला असता दुसऱ्या दिवशी विद्यार्थांना दिलेली पुस्तके शाळेने पुन्हा जमा करायला सांगितली. विशेष म्हणजे उरणमधील ही शाळा नामांकित शाळा असून ग्रॅज्युएशनपर्यंत मुलांना शिक्षण देते. त्याच शाळेत आसाराम बापूच्या पुस्तकांवर परीक्षा घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र सद्या मुलांना देण्यात आलेली पुस्तक पुन्हा घेऊन या आणि जमा करा असे आदेश शाळेने दिले आहेत. बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व्यक्तीचे धडे मुलांना कसे काय द्यायला शाळा तयार झाली? असाही प्रश्न पालक विचारत आहेत. महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असे सवाल आता पालक विचारू लागलेले आहेत. ‘वरून’ जरी आदेश आलेला असला तरी शाळेनी याला विरोध का केला नाही? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडले आहेत.
याबाबत शाळेचे मुख्याध्यापिका नीलिमा विलास नारखेडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. सदरची घटना लक्षात येताच आम्ही त्वरित ती पुस्तके परत घेत संस्थेच्या वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगितले. तर शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार इमानदार यांनीही याची कबुली देऊन, सदरची घटना चुकीची असून याची चौकशी करू असे सांगितले.