१२०० हेक्टर जमिनीवर होणार पेरणी, शेतकरी लागला भात पेरणीच्या कामाला
सलीम शेख
माणगाव : काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी प्रमाणे १५ दिवस उशिरा शेतात आले असून शेतकरी आपल्या रब्बी हंगामाच्या भात पेरणीच्या कामाला लागला आहे. उशिराका होईना पण यंदाचे वर्षीही कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने हाती घेतली आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाचे वर्षीही अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठया प्रमाणात माती, दगड, गाळ त्याच बरोबर शेवाळ व झाडे, झुडपे वाढली असून या कालव्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने सुरु केली नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिक घेणारे शेतकरी चिंतेत होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील भात पिक घेण्यासाठी मशागतीची कामे पूर्ण करून बी-बियाणे व खत खरेदी करून तयार होता. अखेर शेतात पाणी आल्याने शेतकऱ्याने आपली पेरणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान होत आहे. यंदाचे वर्षी १२०० हेक्टर वर भात पेरणी होणार आहे.
माणगाव तालुक्यातील शेतकरी चांगलाच रब्बी हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागला असून रब्बी हंगामातील पिक घेण्यासाठी आपल्या शेताची मशागतीची कामे करण्यात मग्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पंधरा डिसेंबरला कालव्याला पाणी सुटेल या डेडलाईनकडे शेतकऱ्याचे डोळे लागले होते. यांत्रिक विभागाकडून मशनरी यंदाचे वर्षी एकच उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम संत गतीने झाले. अनेक ठिकाणी कालव्याची कामे करणे बाकी राहिल्याने तीही कामे केली जातील अशी माहीती माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांनी प्रतीनिधींशी बोलताना दिली. माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी भात पिक मोठया प्रमाणात घेतात व उर्वरीत शेतकरी कडधान्यांची पिके घेतात.
माणगाव तालुक्यात दुपिकी भातपिक शेतकरी घेतात. कालव्याच्या पाण्यावर शेकडो हेक्टर भातपीक घेतले जाते. रब्बी हंगामातील हे पिक शाश्वत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करतो. यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घरी धान्य ठेवून उर्वरित धान्य बाजारात विकतो. त्यामुळे त्याचे आर्थिक उत्पन्न वाढते. त्याचबरोबर गुरांसाठी भाताचा पेंडा वैरण म्हणून त्याला मिळतो. कालव्याची कामे शासनांनी वेळीच हाती घेवून माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आल्यास माणगाव तालुका सुजलाम सुफलाम् होईल व माणगावच्या आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावेल. सन २०१८ मध्ये चार हजार नवशे त्रेपन हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी १२४८ हेक्टर सिंचन झाले होते. यंदाचे वर्षी माणगाव शाखेवर ७९.३२ हेक्टर जमिनीवर तर मोर्बा शाखा ६१.२३ हेक्टर जमिनीवर सिंचन करण्यात आले होते. गोरेगाव शाखा कालवा गेल्या वर्षी लिकेजमुळे बंद होता. धरणाचीवाडी ते माणगाव हे ३० कि.मी अंतर आहे.