• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची स्वच्छता गृहाअभावी कुचंबणा

ByEditor

Jan 9, 2024

रायगड प्राधिकरणाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

मिलिंद माने
महाड :
शिवछत्रपतींची राजधानी असणारा ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासहित देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज रायगडावर हजेरी लावतात. मात्र, रायगड किल्ल्यावर व चित्त दरवाजा ते जिजामाता समाधी या पट्ट्यात सार्वजनिक मुतारी व शौचालयाची व्यवस्था नसल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असताना रायगड प्राधिकरण मात्र नको त्या कामावर खर्च करून लाखो रुपयांची उधळपट्टी करत असल्याने रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिवछत्रपतींची राजधानी, ऐतिहासिक किल्ले रायगड पाहण्यासाठी राज्यासह देश विदेशातून हजारो पर्यटक दररोज रायगडावर येत असतात. किल्ल्यावर जाण्यासाठी सद्यस्थितीत दोन मार्गाने जाता येते. एक हिरकणी वाडी येथील रोप वेने तर दुसरा चित्त दरवाजाने पायी पायऱ्या चढत रायगड किल्ल्याची सफर पर्यटक करतात. रायगड किल्ला पाहण्यासाठी दररोज सुमारे 40 ते 45 बसेस मधून राज्याच्या विविध जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या शिक्षकांसोबत येत आहेत. तसेच 20 ते 25 खाजगी बसेसमधून देखील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांच्या प्राध्यापकांसहित रायगड किल्ला पाहण्याचा आनंद घेतात. या सर्व बसेसमधील विद्यार्थिनी व विद्यार्थी व त्यांचे शिक्षक वर्ग हे चित्त दरवाजा मार्गे रायगड किल्ला पायी मार्गक्रमण करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग येत असताना कोणत्याही प्रकारे चित्तदरवाज्यापासून ते पाचाड येथील जिजामाता समाधी ते जिजामाता राजवाडा या पट्ट्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक मुतारी अथवा शौचालयाची व्यवस्था नसल्याने अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी झाडीझुडपांचा आधार घेऊन लघुशंका करण्यासाठी जातात. मात्र, शौचालयाची कोणतीही व्यवस्था या तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात नसल्याने हजारो पर्यटक राज्य शासनाला व लोकप्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

रायगड किल्ला चित्तदरवाजामार्गे पायी जात असताना चित्त दरवाज्यापासून रायगड किल्ल्याच्या होळीच्या माळापर्यंत देखील कोणत्याही पद्धतीची शौचालय अथवा मुतारीची व्यवस्था नसल्याने अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. मात्र याबाबत देखील रायगड प्राधिकरण कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.

रायगड किल्ल्यावर आत्तापासूनच मोठ्या प्रमाणावर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. असे असताना सार्वजनिक शौचालय व मुतारीसाठी पाणी कुठून उपलब्ध करायचे? असा प्रश्न देखील प्रशासनापुढे उभा राहिला आहे. तीच परिस्थिती जिजामाता समाधी ते जिजामातेचा राजवाडा या परिसरात पाहण्यास मिळते. दररोज येणारे हजारो पर्यटक व शिवभक्त यांना अखेर पाचाड ते हिरकणी वाडीपर्यंत असणाऱ्या खाजगी उपाहारगृह, हॉटेल मालकांचा सहारा घ्यावा लागतो. याबाबत राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे लाखो शिवभक्त व पर्यटक सार्वजनिक शौचालय व मुतारी नसल्याने राज्य शासनाला व लोकप्रतिनिधींना दररोज शिव्यांची लाखोली वाहत आहेत.

रायगड किल्ल्यावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ज्याप्रमाणे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करते त्याच पद्धतीने जानेवारी ते मे या कालखंडात लाखो पर्यटक रायगड किल्ला पाहण्यासाठी येत असतात या पर्यटकांना प्रशासनाने मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली तर उत्तम होईल जेणेकरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी व शिक्षकांचे तसेच आबालवृद्धांचे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता गृहाचे विघ्न दूर होईल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!