माणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न
सलीम शेख
माणगाव : आपला देश आज हुकूमशाहीच्या दिशेने चालला असून मोदी व भाजप देशाची लोकशाही नामशेष करायला निघालीय असून या हुकूमशाही विरोधात आपले नेते उद्धव ठाकरे यांची लढाई असून त्यांना ताकद देण्याचे काम आपण सर्वांनी करायला हवे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी माणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथे मोतीराम बँक्वेट हॉल रंगमंच याठिकाणी सोमवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी अनंत गीते यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. या मेळाव्यास महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे, तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, जिल्हा संघटक बळीराम घाग, लोणेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर ढेपे, नगरसेवक अजित तारळेकर, चंद्रकांत पवार, जिल्हाप्रमुख युवासेना बंटी पोटफोडे, महिला आघाडीप्रमुख तृप्ती गिरासे, स्वाती नलावडे, सौ. सुखदरे, तालुका संपर्कप्रमुख संजय साकले, सीताराम मेस्त्री, समन्वयक विधानसभा महाड रोहित पारधी, सुधीर सोनावणे, अनिल मोरे, बाबू कळंबे, लक्ष्मण महाळुंगे, विश्वंभर दांडेकर, रणजित मालोरे, विभागप्रमुख गोरेगाव शिवाजी गावडे, वलिद हूर्जुक, भरत देवघरे, आरिफ मणेर, अजिंकेश जाधव यांच्यासह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री गीते पूढे म्हणाले कि, २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. १७ मे पूर्वी नवीन लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेची आचारसंहिता जाहीर होईल. दीड महिन्यात ६ ते ७ टप्प्यात देशाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. देशात निवडणुकीचे वातावरणाला सुरवात झाली आहे. भाजपने वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. विविध कार्यक्रम भाजप देशात घेत आहे. नुकत्याच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या ५ राज्यांच्या निवडणूक झाल्या. त्यामध्ये ३ राज्यात भाजप सत्तेवर आली तर तेलंगणाला काँग्रेस व मिझोरामला प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले. मतदानाची आकडेवारी पहिली तर भाजपला ३ राज्यात मिळालेले मतदान ४१ टक्के असून काँग्रेसला मिळालेले मतदान ३९.५० टक्के आहे. म्हणजेच फक्त दीड टक्क्याने काँग्रेस मागे पडली. आता यापुढे मोदी लाट थोपविण्याची ताकद आपल्या इंडिया आघाडीत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आय, शेतकरी कामगार पक्ष हे सर्व इंडिया आघाडीत असून वंचित आघाडी सोबत उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरु असून लहान मोठे अनेक पक्ष स्वखुशीने महायुतीच्या हुकूमशाहीला गाढण्यासाठी इंडिया आघाडीत सामील होत आहे. येणाऱ्या काळात आता अखंड देशात इंडिया आघाडीची लाट येईल. भाजपचे यश हे अर्धे सत्य असून काँग्रेसचा पराभव हा देखील अर्ध सत्य आहे. म्हणजेच ५९ टक्के सर्वजण एकत्र आले तर भाजपचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा भुईसपाट झाल्यावर गद्दार पळून जातील.
स्नेहलचे भाषण ऐकल्यावर असे वाटले कि, आमदार होण्याची पात्रता स्नेहलमध्ये असून १०० टक्के ती महाड विधानसभा मतदार संघाची आमदार होणार. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून अनिल नवगणे यांच्या नावाची शिफारस उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रायगड व मावळ या दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर मागून घेतली आहे. रायगड व मावळच्या खासदार हा आपलाच होणार आहे. २०२४ ला कायमचा भाजपचा ढोल वाजल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी जागरूक असणे आवश्यक आहे. कार्यकर्ता जागरुग राहिला तर मतदारही जागरूक होईल. सत्तेचा दुरुपयोग करून भाजपने गलिच्छ व नीच राजकारण महाराष्ट्रात केलं आहे. यापूर्वी असे कधीही महाराष्ट्राने पहिले नाही. ७० वर्ष काँग्रेसची गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता होती. त्यांनी कधीही असे गलिच्छ व नीच असे राजकारण केले नाही. विरोधक घरे फोडण्याचे काम करीत आहेत. काका-पुतण्याचा वाद सर्वजण पाहत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे माझा मार्ग मोकळा झाला. तटकरे २०१९ च्या निवडणुकीत मतदारांना सांगायचे गितेंना मत म्हणजे मोदीला मत आता हीच तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेत आता त्यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल व्यक्त करीत मोर्बा ग्रामपंचायत निवडणुकीत आपण व शेकाप एकत्र असतो तर काँग्रेस अजित पवार गटाला आपण पाणी पाजले असते, त्यावेळी आपली झालेली हि चूक आपल्यला सुधारावी लागणार आहे असे गीते यांनी सांगत येणाऱ्या निवडणूक विचारात घेऊन कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.