अनंत नारंगीकर
उरण : तालुक्यात सध्या परप्रांतिय भंगारवाल्यांनी अनेक ठिकाणी भंगाराची दुकाने थाटली असून संपुर्ण उरण तालुक्याला या भंगार माफियांचा विळखा पडला आहे. या भंगार वाल्यांनी सिडकोच्या, जेएनपीटीच्या आणि महसूल विभागाच्या करोडो रूपयांच्या मोक्याच्या जागांवर अतिक्रमण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या भंगारवाल्यांच्या दुकानांमधून चोरीच्या मालाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असल्याने गावोगावचे तरुण, कामगार वर्ग हे चोरी केलेला माल सर्रासपणे भंगार व्यवसायिकांना विकत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरी अशा भंगाराच्या गोदामामुळे तरुण, कामगार वर्ग हे गुन्हेगारी कडे वळत असल्याचे दिसत आहे.

उरण तालुक्यातील सिडको, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर भंगारवाल्यांची दुकाने सुरू झाली असून अनेक शासकीय जागांवर या भंगार माफियानी आपला ताबा घेतला आहे.उरण शहर, उरण-पनवेल रस्ता, खोपटा पुला पासून ते नवघर व पुढे नवघर ते आयओटीएल कंपनी, दास्तान फाटा ते दिघोडे, गव्हाण फाटा ते चिरनेरपर्यंत अनेक भंगाराची दुकाने दिसून येतात. हे बहूतांशी भंगारवाले परप्रांतिय असून एखाद दुसऱ्या स्थानिकाला हाताशी धरून ते या व्यवसायात आपला जम बसवत आहेत. जास्त पैसा कमावण्यासाठी हे भंगारवाले कोणतीही धोकादायक वस्तू खरेदी करायला मागे पुढे पहात नाहीत. काही वर्षापुर्वी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी रॉकेट लाँन्चर्स सारख्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या होत्या. या भंगारवल्याच्या अशा बेफिकीरी वृत्तीमुळे एखादे दिवशी तालुक्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

कधी-कधी सिडको व पोलीस अधिकारी या भंगाराच्या दुकानांवर कारवाई करण्याचे नाटक करतात मात्र, त्यांची पाठ वळते न वळते तोच या भंगारवाल्यांची दुकाने पुन्हा जैसे थे स्थितीत सुरू असल्याने या मागचे गौडबंगाल काय आहे हे लोकांना कळून चुकले आहे. शासकीय जागेच्या व्यतिरिक्त अनेक गावात देखिल अशा प्रकारची दुकाने ठिकठिकाणी दिसून येतात. गावातील स्थानिक मंडळी भाड्यापोटी या व्यवसायिकांना आश्रय देत असल्याचे दिसून येत आहे. या बाबत गावा-गावात सायकलवर फिरून भंगार गोळा करणाऱ्या एका भंगार वाल्याला विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही गोळा केलेला भंगार विकत घेणाऱ्या मुख्य मालकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी हितसंबध असतात. त्यांमुळे आमच्यावर काहीही कारवाई होऊ शकत नाही. तसेच गावातील तरुण व कामगार वर्ग हे आपआपल्या ठिकाणाहून माल चोरुन सदर भंगाराच्या गोदामात विक्रीसाठी घेऊन येतात, त्यांना त्या बदल्यात पैसे मिळतात. नूकताच उरणमधील काही तरुणांनी गाडीच्या बॅटऱ्या चोरुन विकल्या असता पोलिसांनी त्यांना आर्थिक हितसंबंध जपत सोडून दिले आहे.
