घन:श्याम कडू
उरण : येथील रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उरण रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे. परंतु रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी एकमेव गेट आहे. या गेटमधून ये-जा करताना वाहने वेगाने येत असतात, त्याचबरोबर मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारी वाहनेही वेगात असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची खबरदारी म्हणून रेल्वे स्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर दोन्ही साईडला गतिरोधक बसविण्यात यावे. यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण येणार आहे.
तसेच स्थानिक रिक्षा चालकांना रेल्वे स्थानकांच्या आतमध्ये रिक्षा उभी करण्यास मनाई करून गेटच्या बाहेर मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. यामुळेही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रिक्षा चालकांना रिक्षा रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभी न करता आतमध्ये उभी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिक रिक्षा चालकांनी केली आहे.