अनंत नारंगीकर
उरण : जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील मालाची हाताळणी करणाऱ्या वैष्णवी लॉजिस्टिक या गोदामाला आग लागल्याची घटना सोमवारी (दि. १५) सकाळी ठिक ९-३० च्या सुमारास घडली. सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. या आगीत थोडक्यात कामगार बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त होत आहे.

उरण हा ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेला तालुका असून या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यात जेएनपीए बंदरावर आधारीत मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांची निर्मिती ही शासकीय नियमांची पायमल्ली करून होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक वेळा देश-परदेशातील मालाची हाताळणी करणाऱ्या सदर गोदामाला आगी लागल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी जासई व चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णवी लॉजिस्टिक या मालाची व केमिकलची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. यावेळी संबंधित प्रशासनाने गोदाम मालक तसेच संबंधित ठेकेदार यांची पाठराखण करुन सदर प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्याच कामगार व रहिवाशांच्या जीवाशी खेळत असलेल्या वैष्णवी लॉजिस्टिक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला सोमवारी (दि. १५) मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी (९-३० वा.) पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार थोडक्यात बचावल्याचे समजले. या घटनेची माहिती सिडको, जेएनपीए येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. एकंदरी वैष्णवी लॉजिस्टिक पार्क या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला वारंवार आग लागल्याची घटना घडत असल्याने जासई चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून गोदाम मालक व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील जासई तथा चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णवी लॉजिस्टिक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली असून सदर आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
-डॉ. उदय कदम
तहसीलदार-उरण