वृक्षतोडीच्या परवानगीवरून दोन खात्यांमध्ये वाद?
मिलिंद माने
महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या चौपदरीकरणाचे काम जरी अंतिम टप्प्यात असले तरी महामार्गाच्या चौपदरीकरणामधील धोकादायक स्थितीतील दासगाव खिंड आजही वादाच्या भोवऱ्यात आहे. वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने दासगाव खिंडीतील जोड रस्त्याला अडथळा ठरणारे दोन वृक्ष तोडण्यावरून तसेच जोड रस्त्यासाठी रुंदीकरण होणाऱ्या वनखात्याच्या जागेवरून वाद शिगेला पोहोचला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या दुसऱ्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षापासून सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात दासगाव गाव हद्दीतील दोन डोंगराच्या मधील दासगाव खिंड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या ठिकाणी जुन्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने वन खात्याची जमीन आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक संघर्षानंतर मागील वर्षी या ठिकाणी रुंदीकरणाला वनखात्याकडून परवानगी मिळाली. गेली दोन महिन्यापासून त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनी मार्फत दासगाव खिंडीच्या रुंदीकरणाचे काम काम सुरू आहे. त्या ठिकाणी महामार्गापासून गावाला जोडणारे दोन्ही बाजूने दोन जोड रस्ते (सर्व्हिस रोड) आहेत. मात्र हे दोन्ही रस्ते काम सुरू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात आहेत.

दासगाव गावातून मुंबई दिशेला जाणारा मार्ग या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीने महामार्गाला खिंड न फोडता अर्धवटच ठेवला आहे. या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी वनविभागाने काही अंतरा पुरतीच परवानगी दिली असून अद्याप डोंगरमाथ्यावरील भागाला परवानगी दिली नसल्याने या ठिकाणी रुंदीकरण करता येत नाही. त्यामुळे मुंबई दिशेला जाणारा जोड रस्ता अर्धवट महामार्गाला जोडण्यात आला आहे. त्याच प्रमाणे मुंबई दिशेहून दासगाव गावात उतरणाऱ्या जोडरस्त्याची देखील तीच परिस्थिती आहे. या मार्गावर काही घरे होती यांचा मोबदल्याचा प्रश्न असल्याने सुरवाती पासूनच त्या ठिकाणी रुंदीकरण आणि जोडरस्त्याचे काम थांबले होते. काही दिवसापूर्वी हा वाद मिटला नसता तर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या एल अँड टी कंपनी या ठिकाणीच काम सोडून जाण्याच्या तयारीत होती अशी माहिती ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर जगमोहन नायडू यांनी दिली होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील दासगाव खिंडीमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जरी सुरू असले तरी वनखात्याने जेवढ्या जागेत काम करण्यास परवानगी दिली आहे तेवढेच काम सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या निकृष्ट दर्जाचे काम करणारी एल अँड टी कंपनी या ठिकाणी परवानगी व्यतिरिक्त काम करण्यास तयार नसल्याने या धोकादायक खिंडीमध्ये रुंदीकरण होऊ शकणार नाही. दुसरी महत्त्वाची बाब सध्या मुंबई दिशेहून गावाला उतरणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या जोडरस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी देखील रस्त्याची हीच परिस्थिती आहे. या मार्गावर दोन भली मोठी वृक्ष आहेत. ती निकृष्ट दर्जाची काम करणारी एल अँड टी कंपनी, राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा वन विभाग यापैकी कोणीही ते वृक्ष तोडण्यास तयार नाही. या रस्त्यामधील दोन वृक्षांमुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणारी एल अँड टी कंपनी हे वृक्ष तोडण्यास तयार नाही. या संदर्भात वन विभागाकडे चौकशी केली असता त्यांचे म्हणणे आहे ही दोन वृक्ष महामार्गाच्या हद्दीत आहेत त्यांनी तोडीची परवानगी घेणे गरजेचे आहे. अद्याप परवानगी घेतलेली नाही. परवानगी शिवाय वृक्ष तोडून देणार नाही. त्याच बरोबर महामार्ग बांधकाम विभागाच्या कार्यकारी उप अभियंता आकांक्षा मेश्राम यांच्याकडे या वृक्षांबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले आमच्याकडे वृक्ष तोडीची परवानगी आहे. एल अँड टी कंपनी म्हणते परवानगी दाखवा वृक्ष तोडतो, वन विभाग सांगतोय परवानगी नसल्याने वृक्ष तोडून देणार नाही आणि महामार्ग विभाग म्हणतोय परवानगी आहे तर मग वृक्ष का तोडले जात नाही? दासगाव जोड रस्त्याचे काम पूर्ण का होत नाही?
खिंडीचे रुंदीकरण होत नसल्याने महामार्गापासून गावाला जोडणाऱ्या दोन रस्त्यांचे काम अर्धवट असल्याने रस्त्यांना तीव्र चढाव आणि उतार निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूस पादचारी मार्ग आहे. चढाव आणि उतार कमी होणे गरजेचे असताना निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीने मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. याचे गंभीर परिणाम दासगावकरांना भविष्यात भोगावे लागणार आहेत. जर अशाच प्रकारे हा रस्ता राहिला तर मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष द्यावे अन्यथा अपघातास ते जबाबदार राहतील. अशी प्रतिक्रिया या दासगाव येथील रहिवासी पांडुरंग सूर्यकांत निवाते यांनी दिली.