अनंत नारंगीकर
उरण : दास्तान व नवघर येथील गोळी बारातील शेतकरी हुतात्म्यांना मंगळवारी (दि. १६) जासई स्मारकात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थानिक भूमीपुत्रांचे योग्य पुनर्वसन आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लागणे हीच आंदोलनातील शेतकरी हुतात्मे आणि शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांना खरी आदरांजली असेल असे मत व्यक्त करण्यात आले. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र काम करण्याचे ही आवाहन करण्यात आले.

१६ व १७ जानेवारी १९८४ या दिवशी उरण मध्ये शासनाच्या नवी मुंबई करीता करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला सिडको बाधित शेतकऱ्यांनी दिबांच्या नेतृत्वाखाली विरोध दर्शविला होता.यावेळी पोलीस यंत्रणेने सदर शेतकऱ्यांवर लाठीमार, गोळीबार केला होता.या शेतकरी लढ्याचा ४० वा हुतात्मा दिन मंगळवारी (दि. १६) साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एन सी सी च्या।विद्यार्थ्यांनी मांवनदना दिली. १९८४ च्या देशात गाजलेल्या या शेतकरी आंदोलनात १६ जानेवारीला दास्तान फाटा येथे झालेल्या गोळीबारात नामदेव शंकर घरत(चिर्ले)व रघुनाथ अर्जुन ठाकूर(धुतुम) या दोन शेतकऱ्यांना वीर मरण आले.तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला नवघर फाट्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवरही गोळीबार झाला. या गोळीबारात कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील (पागोटे) या पिता पुत्राने हौतात्म्य पत्करले.

अशा गौरव व शौर्यशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी धुतूम, चिर्ले व जासई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार जयंत पाटील, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आ. बाळाराम पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, भूषण पाटील, जे. एम. म्हात्रे, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, महादेव घरत, धुतूम सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर,जासई सरपंच संतोष घरत, प्रेमनाथ ठाकूर, जितेंद्र घरत, प्रकाश ठाकूर , नरेश घरत तसेच दिबांचे पुत्र अतुल पाटील आदींसह इतर मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले..