महेंद्र म्हात्रे
नागोठणे : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. मशागतीची कामं पूर्ण झाली असून, पेरणीसाठी शेतकरी सज्ज आहेत. पावसामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आता पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी सुखावला आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसाचे आगमन झाल्यानं शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. या पावसामुळं आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. नागोठणेसह रोहा, पेण, पाली या भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे.