धरण परिसरात मद्यपींची वर्दळ कायम
मिलिंद माने
महाड : महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाला गळती लागली असून धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे महाड नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून गेली अनेक वर्षांपासून या धरणाची दुरुस्ती न झाल्याने पदपथावरील रेलिंग तुटली आहे. तसेच भिंतीमध्ये रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनले आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष घालून स्वच्छता आणि दुरुस्ती केली नाही तर पावसाळ्यात धरण फुटण्याचा धोका उद्भवू शकतो.

महाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १९६२ साली धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम दगडी असून कुर्ला परिसरातील डोंगर भागातून आलेले पाणी या धरणात साचून राहते. या धरणाची पाणी क्षमता जवळपास ०.५११ दश लक्ष घनमीटर आहे. धरणाचा गाळ एकदा काढल्याचे सांगण्यात येते मात्र त्यानंतर जवळपास चाळीस वर्षानंतर देखील या धरणाची दुरुस्ती अगर गाळ काढून धरण स्वच्छ केले गेले नाही. यामुळे सध्या या धरणाची दुरवस्था झाली आहे. गाळ काढून धरण स्वच्छ करणे ही काळाची गरज असली तरी धरणाची क्षमता आणि मजबुती याचा विचार होणे अपेक्षित असल्याने गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे.

महाड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असुन या वाढत्या लोकसंख्येची तहान कुर्ला धरण भागवत आहे. या धरणाची देखभाल देखील महाड नगर परिषदेच्या अखत्यारीत आहे. मात्र पालिकेच्या दुर्लक्षामुळे धरणाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे असलेल्या सुरक्षा कर्मचारी निवासाचे खंडर बनले आहे. या निवासाचाच आधार तरुण मोठ्या प्रमाणावर मद्य प्राशन करण्यासाठी घेत आहेत. धरण हि बाब संवेदनशील असून याठिकाणी सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. सध्या धरणाचा परिसर असुरक्षित बनला असून याठिकाणी कोणतीच सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आलेली नाही. महाड नगरपालिकेचा कर्मचारी फक्त याठिकाणी पाहणी करून येतो. यामुळे सायंकाळी या परिसरात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या दारू पिणाऱ्यांनी धरणाच्या पाण्यातच रिकाम्या बाटल्या देखील टाकून दिल्या आहेत. धरणाच्या भिंतीवर असलेला पदपथ देखील कोसळण्याच्या स्थितीत आहे.
कुर्ला धरणाच्या पदपथाला मोठे भगदाड पडले आहेत. तर रेलिंग देखील तुटून गेले आहे. धरणाच्या भिंतीवर विविध वनस्पतींची रोपे वाढली आहेत. भविष्यात याच रोपांची मुळे भिंतीत खोलवर जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. धरणाच्या शेजारील भिंतीत देखील मोठमोठ्या जंगली रोपांची वाढ झाली आहे. गेली अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले न गेल्याने ही रोपे वाढली आहेत. कुर्ला धरणात ऐन पावसाळ्यात पाणी ओसंडून वाहते. यामुळे पावसाचे आणि ओसंडून वाहणारे पाणी या रोपांच्या मुळातून आत शिरल्यास भिंतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आधीच या धरणाला जवळपास तीन ते चार लिकेज आहेत. हे लिकेज अद्याप काढण्यात आलेले नाहीत.

कुर्ला धरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम महाड नगरपरिषदेकडे असले तरी धरणाबाबत तांत्रिक माहिती नसल्याने पालिकेने ठराव करून धरणाचे मजबुतीकरण, गळती काढणे, साईड रेलिंग, नवीन पाथवे, फेन्सिंग, गेट, सुरक्षा रक्षक निवास, या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार धरणाचे दुरुस्तीबाबत अहवाल तयार करण्याचे काम अकोटेक या कंपनीला दिले आहे. तर या धरणाचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे काम नाशिक येथील एका संस्थेला दिले होत. महाड नगरपरिषदेने केलेल्या ठरावानुसार धरणाचे मजबुतीकरण, उंची वाढवणे बाबत विचार करणे, पदपथ दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. सदर संस्था दगडी धरणाचा अभ्यास करणारी संस्था आहे. पाटबंधारे विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण आल्याने या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती मात्र, दोन वर्ष झाली तरी अद्याप ठोस उपाय पुढे आलेला नाही.

धरणाच्या भिंती लगत असलेल्या परिसरामध्ये मोठे वृक्ष आणि गवताचे साम्राज्य वाढले आहे. याचा फायदा मद्य प्राशन करणारे तरुण घेत आहेत. शिवाय धरणावरून असलेला पदपथ देखील धोकादायक झाला आहे. या पदपथावरून पलीकडे असलेल्या गावातील काही नागरिक ये-जा करत असतात. धरणाच्या परिसरात असलेला कचरा, छोटी रोपटी काढून स्वच्छता केली पाहिजे. या परिसरात छोटा बगीचा तयार करून नागरिकांकडून नाममात्र प्रवेश कर आकारला गेला तर धरणाची देखील देखभाल दुरुस्ती राहील. सद्या धरण परिसर निर्मनुष्य असल्याने सायंकाळी मद्य प्राशन करणारे तरुण मोठ्या प्रमाणात याठिकाणी ये-जा करत असतात.