भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी घराण्याशी एकनिष्ठ रहा -प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे
विनायक पाटील
पेण : भारतीय बौद्ध महासभा ही संस्था संपूर्ण भारतभर काम करत असून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्धाचार्य हे पद फार महत्त्वाचे आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे आपल्या पायाला भिंगरी लावून समाजासाठी काम करत असताना समाजाने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे असे प्रतिपादन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी पेण येथे केले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा पेण शाखेच्या वतीने रायगड समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन महात्मा गांधी वाचनालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष भिकाजी कांबळे, कोषाध्यक्ष विजय कांबळे, सरचिटणीस सुशिल वाघमारे, रायगड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, महिला जिल्हा सदस्या संपदा चव्हाण, मनिषा सुर्वे, निवृत्त पोलीस अधिकारी पी.झेड.गाडे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, सरचिटणीस सचिन कांबळे आदिंसह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अधिक बोलताना त्यांनी सांगितले की, १९८२ मध्ये रायगडात संस्थेचे काम सुरू झाले मध्यंतरी काम थांबले होते मात्र आता चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेणची संस्था भरारी घेत आहे. असेच काम येणाऱ्या काळात करीत गाव तिथे शाखा आणि घर तिथे समता सैनिक निर्माण करावेत असे त्यांनी यावेळी सांगितले. तर देशात संस्कार घडविण्याचे काम बौद्ध महासभा करत असून तरुणांनी आपल्या डोळ्यासमोर इतिहास उभा केला पाहिजे. शिक्षणाबरोबरच संस्कार घडविणारी एकमेव संस्था आहे. त्यामुळे कोणतेही मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक आवाहनाला तोंड द्या असे आवाहन सरचिटणीस सुशील वाघमारे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या वतीने पत्रकार राजेश कांबळे यांना रायगड समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते यांनाही पुरस्काराने सन्मानित केले.
हे सुद्धा पहा