• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढविणार -सुरेंद्र म्हात्रे

ByEditor

Jan 27, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आदेश दिल्यास अलिबाग मुरुड रोहा विधानसभा लढविण्यास तयार असल्याचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील जनसंवाद सभेच्या आयोजन संदर्भात अलिबाग रेवस बायपास येथील जनार्दन हॉलिडे होम येथे आयोजित बैठकीत सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत सतीश पाटील, कमलेश खरविले, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, कृष्णा कडवे, कैलास गजने, रेखा पेडणेकर, स्नेहल देवरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत पक्ष‎ बांधणीसह संवाद साधण्यासाठी या‎ जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पेण, अलिबाग, रोहा, महाड, माणगाव, म्हसळा याठिकाणी 1 व 2 फेब्रुवारी 2024 या दोन दिवसात सहा सभा होणार असून या जनसंवाद सभेची सुरवात ही पेण येथील सभेने होणार असून समाप्ती ही महाड येथील सभेने होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील जनसंवाद सभा ही अलिबाग मुरुड या दोन तालुक्याच्या मध्यभागी असणारे चौल ग्रामपंचायत हद्दीतील पिरांचे देऊळ येथे होणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी तीन वाजता सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला लोकसभेचे उमेदवार अनंत गीते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेसाठी दहा हजार कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात एक सभा ठेवली असती तर सर्वसामान्य कार्यकर्ता पोहचू शकणार नाही. म्हणून हा जनसंवाद आयोजित करण्यात आले आहे. चौल येथे सभा घेण्यामागचे कारण की, यापूर्वी अलिबाग येथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या तीन सभा होवून गेल्या आहेत म्हणून यावेळी चौल येथे सभा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आपल्या मतदारसंघातील स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्धवसाहेब तुमच्याशी संवाद साधणार आहेत. जनसंवाद यात्रेचा हेतूही तोच आहे. मतदारसंघातील प्रत्येक माणूस शिवसैनिक व्हावा. त्याशिवाय महाराष्ट्र भगवा करता येणार नाही. शिवसेनेची विचारधारा सर्वसामान्याच्या विकास व उद्धारासाठी आहे. जेथे त्रास आहे तेथे मदत करणे, अन्याय असेल तेथे न्याय मिळवून देणे, यासाठीच शिवसेना कार्य करीत आली असल्याचेही म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!