• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कशेळे ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा; ग्रामपंचायतीचे समस्येकडे दुर्लक्ष

ByEditor

Jan 27, 2024

गणेश पवार
कर्जत :
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला कशेळे गावातील तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात २०० हून अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या होत्या. आठ दिवसातून एकदा पाणी येते तर आम्हाला रोजचे पाणी पाहिजे असा प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेत महिलांचा गदारोळ चालू होता. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. ग्रामसभेत कशेळे गावातील पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामअधिकारी यांनी हात झटकत ठेकेदाराकडे बोट दाखवत ग्रामसभा संपवत चहा देऊन महिलांचे तोंड गोड केले.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडीतील महिला यांनी पाणी समस्ये विषयी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मोर्चा आणला होता. या ग्रामसभेला कशेळे ग्रामपंचायतमधील एकही सदस्य उपस्थित नव्हता. ग्रामसभेला सरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थितीत होते. कशेळे गावातील महिला व आदिवासी वाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या. या महिलांना आठ दिवस झाले तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. या त्रासाने महिलांनी स्वतः ग्रामसभेला उपस्थित राहून पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. महिलांच्या पदरी निराशाच आली.

जूनी नळ पाणी योजना चालू आहे तीला दहा वर्ष झाले तरी अद्याप ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामसेवक, सरपंच यांनी हात झटकत ज्यांनी काम घेतले आहे अशा ठेकेदारांकडे बोट दाखवत असून ठेकेदार तुम्हाला पाणी देईल आमची जबाबदारी नाही असे सरपंच यांच्याकडून उत्तर देण्यात आले. आम्ही ठेकेदारांना सांगून लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणी नळाला येऊ दे असे सांगू अशी उडवाउडवीची उत्तरे सरपंचांनी दिली. महिलांनी फार्महाऊस, कंपनीला पाणी दिले जाते ते पहिले बंद करा अशी मागणी करीत आम्ही जे काय बिल, घरपट्टी येईल किंवा मेन्टेनन्सचा खर्च होईल तो आम्ही दर घरटी देऊ असे जमलेल्या महिलांनी सांगितले. बाहेर पाणी देत असल्याने कशेळे गावात पाण्याची टंचाई भासत आहे. जी जूनी पाण्याची योजना आहे त्या योजनेच्या नळाला दोन दिवसाआड पाणी येत असते. आम्हाला रोजच पाणी पाहिजे असे महिलांनी सांगितले.

नविन नळपाणी योजना आहे ती लवकर पूर्ण करून महिलांना पाणी त्यांच्या दारी मिळावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. कशेळे ग्रामपंचायतीसाठी ३.५ कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना मंजूर आहे. बहुतेक काम पूर्ण होत आले आहे. कशेळे येथील काही अडचणीमूळे पूर्ण झाले नाही ते सुद्धा काम मार्च महिन्यात पूर्ण करू असे ठेकेदार रुपेश हरपुडे यांनी सांगितले.

कशेळे गावात आठ दिवसांनी एकदा पाणी येते. आमच्या गावात पाण्याची खुप टंचाई भासत आहे. पाणी आले तरी ते कधीपण येते. पाणी सोडण्याची ठराविक वेळ नाही. आम्ही घरात असलो की पाणी भरतो नसलो तर आठ दिवस पाणी मिळत नाही. गावात नळ असून आम्हाला उपयोग काय? आठ दिवसांनी पाणी मिळत असेल तर आम्ही पाण्यासाठी कोणाकडे जायचे? आम्हाला रोज पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांनी काहीतरी उपाययोजना करावी.

-सुषमा मते
कशेळे ग्रामस्थ महिला.

कशेळे ग्रामपंचायतीसाठी ३.५ कोटीची रुपयाची जल जिवन मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत मे २०२४ पर्यंत आहे. यात बहुतेक गावांना पाईपलाईन टाकून झाली आहे. कशेळे येथील सुद्धा पाईपलाईन टाकून झाली आहे. काही अडचणीमुळे काम हळूहळू चालू आहे. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पाईप फुटले आहेत. त्यामुळे कशेळे गावात पाणी येत नाही ते सुद्धा लवकरच दुरुस्ती करून रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू. मार्च २०२४ पर्यंत सर्व काम पूर्ण होईल.

-रुपेश हरपुडे,
ठेकेदार

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!