मिलिंद माने
महाड : शहरामध्ये रोहिदास नगर परिसरात असलेल्या एका गादी कारखान्याला आग लागल्याने या आगीमध्ये गादी कारखान्यासह शेजारील दुबई शॉपिंग हे कपड्याचे दुकान देखील आगीत जळून भस्मसात झाले. महाड नगरपरिषदेचे अग्निशमन दलाला वेळेवर सूचना करून देखील व पाच मिनिटाच्या अंतरावर अग्निशामक दल ते आग लागलेले ठिकाण असताना देखील वेळेत न पोहोचल्याने आग विझवण्यास विलंब झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

महाड शहरामध्ये नगरपरिषदेच्या आशीर्वादाने मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या दुकाने, हॉटेल उभे करणे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशाच पद्धतीने रोहिदास नगर परिसरात असलेल्या एका मोकळ्या जागेवर जमीन मालकाच्या परवानगीने दुबई शॉपिंग मॉल हे कपड्याचे दुकान पत्र्याचे शेड टाकून उभे केले होते. याच दुकानाच्या मागील बाजूस दुसऱ्या एका खाजगी जमीन मालकाने आपला भूखंड गादी तयार करण्यासाठी भाड्याने दिला होता. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या गादी कारखान्याला आग लागली. दुकानात कोणीही नसल्याने ही आग धूमसत गेली आणि एकच भडका उडाला. या आगीमुळे शेजारी असलेले दुबई शॉपिंग हे कपड्याचे दुकान आगीच्या विळख्यात सापडले. हा हा म्हणता दुकानातील कपडे, प्लास्टिक आदी वस्तूंनी पेट घेतला. अग्निशमन दल येईपर्यंत संपूर्ण दुकान खाक झाले. या आगीच्या ज्वाळांमुळे शेजारील इमारतीच्या वरील बाजूस असलेल्या एका चायनीज सेंटरला देखील आग लागली आणि त्यांचे देखील नुकसान झाले.

प्रथमदर्शनी ही आग दुबई शॉपिंग सेंटर या कपड्याच्या दुकानाला लागल्याचे दिसून येत होते. मात्र, ही आग शेजारील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या गादी कारखान्याला लागल्याचे समजताच अग्निशमन दलाने मागील बाजूने आग विझवण्यास सुरुवात केली. दुबई शॉपिंग या कपड्याच्या दुकानाच्या बाजूला स्वीट मार्ट आणि मोठी इमारत आहे. या इमारतीमध्ये देखील खाजगी रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या खाजगी रुग्णालय ईमारतीमध्ये देखील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे यावेळी दिसून आले. सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात महाड नगरपालिका अग्निशमन दलाला यश आले.
महाड शहरातील सर्वच उपहारगृहांमध्ये व मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये व मोठ्या आलिशान टॉवरच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत यांच्याकडे कोणतीही अग्निशामक यंत्रणा उपलब्ध नाही. मात्र, अग्नि प्रतिबंधक फायर सिलेंडर प्रत्येक उपाहारगृह, रुग्णालय, शॉपिंग मॉल यांना बंधनकारक असताना त्यांच्याकडे या पद्धतीची कोणतीही यंत्रणा नसताना व हे नगरपरिषदेला माहीत असून देखील त्यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प बसणे पसंत केले असल्याने आगीच्या घटना महाड शहरात वारंवार घडत आहेत. मात्र नागरिकांचे बळी गेल्यानंतरच नगरपरिषद जागी होईल का? असा सवाल महाडमधील नागरिक नगरपरिषदेच्या प्रशासनाला विचारत आहेत.