रायगड रोपवेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी?
वाढत्या गर्दीमुळे वयोवृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना रायगड न पाहताच माघारी फिरण्याची नामुष्की
मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतहासिक किल्ले रायगडावर रोप वे झाल्यानंतर शिवभक्त आणि पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच गेली आहे. यामुळे अनेक वेळा रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांना गडावर जाताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. याला पर्याय म्हणून नवीन शासकीय रोप वे ची संकल्पना पुढे आली. मात्र, हा रोप वे प्रकल्प रायगड जिल्ह्यातील उदासीन लोकप्रतिनिधी व केंद्र व राज्य सरकारमधील निष्क्रिय मंत्र्यांच्या कारभारामुळे रायगडवरील नवीन शासकीय रोप वे लाल फितीत अडकला असून याला शासनाची उदासीनता म्हणावी की रायगड रोपवेच्या व्यवस्थापनासमोर राजकीय दबावामुळे सरकारने व लोकप्रतिनिधींनी नांगी टाकली अशी चर्चा रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांमध्ये व पर्यटकांमध्ये व्यक्त होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडवर जाण्यासाठी शासनाकडून हा नवीन प्रस्तावित रोप वे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे टकमक टोकाच्या पायथ्याजवळ रायगडवाडी गावात होण्याकरिता आग्रह राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो शिवभक्त व पर्यटकांकडून तसेच रायगड रोप वेने एकदा जाऊन रायगड रोप वेच्या व्यवस्थापनाची मनमानी धोरणाचा अनुभव घेणाऱ्या लाखो शिवभक्त व पर्यटकांकडून याबाबत मागील दहा वर्षापासून याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले रायगडावर अबालवृद्धांना जाता यावे याकरिता शासनाने रायगड रोप वेची निर्मिती जोग इंजिनीअरिंग या कंपनीच्या सहाय्याने हिरकणी वाडी या ठिकाणी सन 1996 रोजी दादासाहेब जोग यांनी ही रोपवेची संकल्पना अंमलात आणली.

रायगड रोप वे सुरवातीची काही वर्ष जोग कंपनीने आणि त्यानंतर शासनाने ताब्यात घ्यावयाचा असा करार झाला. मात्र, या कराराला दररोज रायगड रोप वेला मिळणाऱ्या लाखो रुपयांच्या उत्पन्नामुळे प्रशासनावर राजकीय दबाव आणून शासनाच्या ताब्यात देण्याच्या त्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे आजही हा रोप वे मिलेनिअम प्रॉपटी या खाजगी कंपनीमार्फत चालवला जात आहे.
रायगडावर प्रतिवर्षी शिवभक्तांची संख्या वाढतच गेली आहे. सुट्टी आणि सहलीच्या काळात तर हि संख्या दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येत जाते. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडवर प्रशासनाकडून व शिवभक्तांमार्फत दरवर्षी शिवपुण्यतिथी व शिवराज्याभिषेक सोहळा तसेच शिवजयंती उत्सव सोहळा या काळात रायगडावर लाखोंच्या संख्येने गर्दी उसळते. यावेळी केंद्र शासनाचे मंत्री, राज्याचे मंत्री, राज्यपाल, खासदार, आमदार व राजकीय नेते यांसह अनेक मान्यवर, केंद्र व राज्य शासनाचे प्रशासकीय अधिकारी येत असल्याने त्यांना रोप वेमधून किल्ल्यावर जाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यामुळे सर्वसामान्य शिवभक्तांना व पर्यटकांना दिवसभर खोळंबून राहावे लागते.
मागील काही दिवस सलग सुट्ट्यांमुळे रायगड किल्ला पाहण्यासाठी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. यामुळे दुपारीच रोप वेची तिकीट विक्री बंद केली जाते. सायंकाळी पाच वाजता रोप वे बंद केला जातो. यामुळे अनेक पर्यटकांना गडावर जाण्याची संधी मिळत नसल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभरातून येणारे पर्यटक राज्य शासनाला व केंद्र शासनाला तसेच सरकारमधील मंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहतात. वेळप्रसंगी रायगड रोप वेच्या व्यवस्थापनाबरोबर शाब्दिक वाद देखील होतात. राज्याबाहेरून आलेल्या हजारो शिवभक्तांना रायगड किल्ला पायी चढणे हे वृद्ध व अपंग व्यक्तींना शक्य होत नसल्याने ते रोप वेने जाणे पसंत करतात. परंतु, रोप वेने जाण्याची संधी मिळाली नसल्याने अनेक शिवभक्तांना व पर्यटकांना रायगड न पाहताच माघारी फिरण्याची वेळ येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ला देशभरासहित राज्यातील प्रत्येक शिवभक्तांना व पर्यटकांना पाहता यावा यासाठी केंद्र सरकारने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे टकमक टोकाच्या पायथ्याजवळ रायगड वाडी गावात हा नवीन रोप वे उभारण्याची संकल्पना आखली. सध्या सुरु असलेल्या रायगड संवर्धन प्रकल्पात या नवीन रोप वेचा समावेश करण्यात आला आहे. याकरिता त्या ठिकाणी असणाऱ्या जागेचे सर्व्हेक्षण देखील करण्यात आले असून टकमक टोकाच्या पायथ्याशी याकरिता मुबलक जागा उपलब्ध आहे. याठिकाणी नवीन रोप वेची मागणी शिवभक्त आणि किल्ले रायगड परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत रायगड प्राधिकरणाच्या बैठकीत प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना रायगड हितवर्धक समिती आणि रायगड परिसर विकास समितीकडून एक निवेदन देखील देण्यात आले होते. वेळोवेळी झालेल्या बैठकीत नवीन रोप वेची मागणी करण्यात येत होती. सुरवातीच्या काळात याला खा. संभाजीराजे यांनी देखील चालना दिली होती मात्र, त्यानंतर याला पूर्णविराम मिळाला आहे.
रायगडवर जाण्यासाठी नवीन प्रस्तावित रोप वे रायगड वाडीच्या पायथ्याशी उभारण्याचा निर्णय झाला. मात्र., त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्या अगोदरच याउलट प्रशासनाने रायगड रोप वेला आणखी एक झुला जोडण्यास परवानगी दिली. असे करून देखील वाढत्या गर्दी मुळे पर्यटक, शिवप्रेमी यांना रायगड न पाहताच परतावे लागत आहे.
नवीन रोप वे रायगडवाडीत होण्याचा फायदा
- या ठिकाणी काळ जलविद्युत प्रकल्प होत असल्याने पर्यटनाला वाव
- मुबलक जागा उपलब्ध असल्याने पार्किंगचा प्रश्न सुटणार
- या परिसरातील वाड्या आणि गावाचा विकास
- रायगडवाडी गावातील दुर्लक्षित वास्तु उजेडात येतील
रायगड वाडी गावाजवळील या नवीन रोप वेमुळे किल्ले रायगड परिसरातील रायगडवाडी गावासह टकमक टोक, आवाड, परडी या वाड्यांचा देखील विकास होणार आहे. रायगड किल्ल्याच्या बांधणीत लागलेल्या साधनांचे कारखाने याच रायगडवाडी गावात होते. त्याचे अवशेष देखील आजही याठिकाणी कायम आहेत. याठिकाणी एक दुर्लक्षित शिवमंदिर, शिवकालातील वास्तू, विहिरी पहावयास मिळतात. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा शिवराज्याभिषेक केला त्या निश्चलपुरी गोसावी यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. यामुळे या दुर्लक्षित वास्तु देखील उजेडात येतील. या टकमकटोकाच्या पायथ्याशीच काळ जलविद्युत प्रकल्प होत आहे. यामुळे या प्रकल्पात साचणारे विस्तीर्ण पाणी आणि एकीकडे किल्ले रायगड असे सुंदर दृश्य या नवीन रोप वेमधून पहावयास मिळणार आहे.
रायगडवाडी गावात मुबलक पाण्याची देखील सुविधा आहे. शिवाय या गावाच्या जवळच काळ जलविद्युत प्रकल्पाचे पाणी साचणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जागा देखील ग्रामस्थांनी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. यामुळे या मागणीचा विचार शासनाने भविष्यातील पर्यटनाचा विकास पाहून करावा अशी आशा येथील ग्रामस्थांना आहे.
हिरकणीवाडी याठिकाणी सध्या अस्तित्वात असलेल्या रोप वे परिसरात जागेचा अभाव आहे. रोप वेकडे जाणारा मार्ग हा देखील अरुंद असल्याने याठिकाणी कायम वाहतूक कोंडी होत असते. ज्या ठिकाणी हा रोप वे उभा आहे त्या परिसरात ऐन पावसाळ्यात जमिनीला भेगा पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
हिरकणी वाडी येथे असणाऱ्या सद्यस्थितीत जोग कंपनीचा अस्तित्वात असलेल्या रोप वेमध्ये जागेचा अभाव असल्याने पर्यटकांचे हाल होतात. तासनतास ताटकळत बसण्याची वेळ त्यांच्यावर येते. याठिकाणी उत्तम बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकजण तिकीट न काढताच परत फिरत आहेत. हिरकणी वाडी येथे असणाऱ्या रायगड रोप वेच्या ठिकाणी महिलांसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था रोप वेकडून अंमलात आणली जात नाही. तसेच महिला स्वच्छतागृहांची देखील स्वच्छता नाही व अपुरी संख्या असल्याने अनेक महिलांना रेशन दुकानांप्रमाणे लाईनमध्ये उभे राहावे लागते,
रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणाऱ्या साठ वर्षावरील वयोवृद्ध रुग्णांना असणारे मधुमेह, उच्च रक्तदाब व अतिसार होण्याची शक्यता बघता रायगड रोपवे जवळ कोणतीही वैद्यकीय सुविधा व रुग्णवाहिका उपलब्ध नाही. रायगड रोपवे मधून जाणाऱ्या हजारो पर्यटकांना व शिवभक्तांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवले जात नाही. रोप वेमधून जाणाऱ्या पर्यटकांसाठी व शिवभक्तांसाठी रोप वेकडून स्वतःची कोणतीही पार्किंगची व्यवस्था नसल्याने हजारो पर्यटकांना खाजगी पार्किंगमध्ये आपली वाहने पार्किंग करून अव्वाच्यासव्वा पैसे देऊन आपली वाहने पार्किंग करावी लागतात.
रायगड रोप वेच्या ठिकाणी हजारो पर्यटक दिवसभरात येत असताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा प्रसंग घडल्यास स्वतःची कोणतीही अग्नी प्रतिबंधक यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक झाले की पर्यटकांना तासनतास बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. रायगड रोप वेने जाणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी कोणताही अपंग रॅम्प उभारलेला नाही. तसेच अपंग व्यक्तींसाठी शौचालय व मुतारीची स्वतंत्र व्यवस्था केलेली नाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची रायगड रोप वेला ॲलर्जी?
केंद्रासहित राज्यातील सरकारमधील मंत्री असो की खासदार, आमदार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण चालू होत नाही किंवा निवडणुकीचा प्रचार असो की जाहीर सभा व उद्घाटन हे समारंभ असो याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन व त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूनच केली जाते. मात्र रायगड रोप वे कंपनीने प्रकाशित केलेल्या व खाजगी वितरणासाठी दिलेल्या डायरीमध्ये (रोजनिशी) छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो नाहीत. याबाबत रायगड रोप वेच्या कंपनीला कोणते वावडे आहे? असा सवाल हजारो शिवभक्त व पर्यटकांकडून विचारला जात आहे. ज्यांच्या नावाने तुम्ही दिवसभर लाखो रुपयांची आणि वर्षाकाठी करोडो रुपयांची कमाई करता त्यांचा फोटो रायगड रोप वेच्या डायरीत नसणे ही रायगड रोप वेला याबाबत कोणते वावडे आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच फोटो त्या डायरीमध्ये नसणे ही रायगड रोप वेला असलेली ॲलर्जी आहे का? असा सवाल लाखो शिवभक्त विचारत आहेत.