मनोज जरांगे किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक
मिलिंद माने
महाड : रायगडावर ऊर्जा मिळते ती इतरत्र कुठे मिळत नाही. ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतल्याचे मराठा आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी चालत गेलेले मनोज जरांगे यांनी आपली भूमिका रायगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी स्पष्ट केली.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकर्यांसोबत मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर आज प्रथमच मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला नतमस्तक होण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते. यावेळी रायगड किल्ल्यावर चित्त दरवाजामार्गे पायी जाण्याचा निर्धार हजारो कार्यकर्त्यांसह घेऊन रायगडावर जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इथे ऊर्जा मिळते इथली ऊर्जा घेऊनच मी विजय संपादन केला असून इथे ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार असे सांगून ते म्हणाले कि, ज्या मराठ्यांना नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगे सोयरे असा कायद्याचा अध्यादेश पारित झाला त्यामुळे यापुढे आरक्षणाविना एकही मराठा उपेक्षित राहणार नाही.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, रायगडापेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही. रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय येथील शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन व रायगडची माती कपाळाला लावून यापुढील मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातली लढाई चालू राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे यांच्याबरोबर हजारो मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते व सकल मराठा समाजातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून राज्याच्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाची नेते मंडळी हजर झाली होती.