अनंत नारंगीकर
उरण : खोपटा पुल-कोप्रोली या रस्त्यावरील साईटपट्ट्या खचल्याने रात्री अपरात्री अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी (एनएचएआय)चे अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदरामूळे उरण पुर्व विभागाच्या परिसराचा कायापालट झपाट्याने होत आहे. त्यामुळे या परिसरातील दळणवळणाची सोय उत्तम असावी यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाहतूकीच्या दुष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चिरनेर-कोप्रोली-खोपटा पुल या रस्त्याच्या कामासाठी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीकडून सुमारे ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. मात्र, संबंधित कार्यालयाचे अधिकारी व ठेकेदार यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या डोळ्यात धुळफेक करुन सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करुन निधी हडप करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होऊन साईटपट्ट्या खचल्या आहेत. त्याचा त्रास हा अवजड वाहन व प्रवाशी, वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे.

त्यातच सदर रस्त्यावर रात्री अपरात्री वारंवार अपघाताची संख्या वाढली असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी सदर अपघातात प्रवाशांचा नाहक बळी जाण्याची वाट न पाहता उरणचे आमदार महेश बालदी यांनी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.