• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते व पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष; अपघाताला कारण!

ByEditor

Jan 30, 2024

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता व संबंधित ठेकेदार कंपनी करीत नसल्याने राष्ट्रीय महामार्गावर सकाळ, संध्याकाळ व रात्रीच्या वेळी अपघातांची मालिका आजदेखील सुरूच आहे. रस्ता सुरक्षेसारखे उपक्रम कागदोपत्री राबवले जात आहेत. प्रत्यक्षात महामार्गाच्या कामामध्ये या सुरक्षेबाबत दुर्लक्ष केले जात असल्याने निष्पाप प्रवाशांचे बळी जात आहेत.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड तालुक्यातील राजेवाडी गावानजीक असलेल्या सावित्री पुलावर असलेला पुलाचा दुभाजक उघडा पडला असून त्यातील लोखंडी सळ्या आणि रॉड बाहेर पडले आहेत. या धोकादायक स्थितीकडे देखील संबंधित रस्त्याचे काम करणारे एल अँड टी कंपनी व राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताला निमंत्रण देण्याचे काम संबंधित कंपनीकडून होत आहे.

महाड तालुक्यातून जाणारा महाड-रायगड मार्ग, म्हाप्रळ-पंढरपूर, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आदी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र, ही सर्व रस्त्यांची कामे प्रवाशांच्या जीवावर बेतत असताना देखील संबंधित खात्याचे अभियंता व संबंधित ठेकेदार मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी स्थानिक नागरिकांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर चौपदरीकरणाचे काम चालू असताना व काही ठिकाणी ते पूर्णत्वास गेले असताना देखील निकृष्ट दर्जाच्या व ठेकेदाराच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षपणामुळे अनेक अपघात या महामार्गावर दररोज घडत आहेत. या अपघातातून शेकडो लोकांचे बळी देखील गेले. चुकीच्या पद्धतीने केलेली बाह्य वळणे, खोदलेले चर, मातीचे ढीग यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दगावल्याच्या घटना मागील महिनाभराच्या काळात वाढल्या आहेत. गेली अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्यांच्या पूर्णत्वासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने रस्त्याच्या कामाला विलंब लागत आहे. ऐन पावसाळ्यात देखील रस्त्याच्या कामामुळे हा रस्ता धोकादायक बनून अपघात झाले आहेत. अशाच पद्धतीने महाड-रायगड मार्गाचे देखील काम सुरू झाले आहे. या रस्त्याचे देखील रुंदीकरण केले जात आहे. महाड नातेखिंड येथून किल्ले रायगडापर्यंत रुंदीकरण केले जात आहे. ज्या ठेकेदाराने सुरवातीला हे काम घेतले त्याच्या कामातील अनेक चुका आणि विलंब झाल्याने नव्याने अन्य ठेकेदाराला हे काम देण्यात आले. सुरु असलेल्या कामामुळे रस्त्यावर प्रचंड धूळ तयार झाली आहे. या धुळीने दुचाकीस्वरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच टप्प्याटप्प्यात केल्या जाणाऱ्या कामामुळे अनेक अपघात देखील झाले आहेत. संबंधित ठेकेदाराच्या अवजड वाहनांकडून रस्ता सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

महाड-रायगड मार्गाच्या सुरक्षेबाबत स्थानिक नागरिकांची तक्रार असतानाच महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर देखील वराठीपासून थेट महाडपर्यंत खोदकाम केले आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढीग, बाह्यवळण, रस्त्यात पडलेली खडी यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. मागील काही महिन्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या रस्त्याकडेला घसरून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभागाला स्थानिक नागरिकांनी तक्रारी, पत्रव्यवहार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली गेली. मात्र, कांही दिवसातच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली आहे. ज्या स्थानिक नागरिकांना महाड शहरात बाजाराला, नोकरीनिमित्त तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज प्रवास करावा लागत आहे महाड औद्योगिक क्षेत्रात आणि सरकारी कर्मचाऱ्यांना दुचाकीवर, सहा आसनी रिक्षाने यावे लागते त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रीच्या सुमारास रस्त्याकडेला असलेल्या सुरक्षा कठड्यावर रेडियम लावलेले नाही यामुळे बाह्यवळण दिसून येत नसल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सावित्री पुलावर असलेल्या दुभाजकामधील जोड निघून गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. यातून निघालेला लोखंडी रॉड एखाद्या वाहनात अडकून अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्याठिकाणी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी दुभाजकाला आणि शेजारी असलेल्या लोखंडी सरंक्षक कठड्यांना हॉटेल मालकांनी आणि इतर व्यवसायिकांनी विनापरवाना फलक लावले आहेत. या फलकांमुळे चालकाचे लक्ष विचलित होवून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, या किरकोळ वाटणाऱ्या मोठ्या चुकांकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मागील दोन दिवसापासून दासगाव गावाजवळ विविध वाहनांचे अपघात झाले आहेत. या अपघातात निष्पाप लोकांचे बळी गेले. सावित्री पुलावर देखील कांही दिवसापूर्वी अपघात झाला होता. रस्त्यांच्या कामासाठी वेळोवेळी केले जाणारे वळण रस्ते, बंद करण्यात येणारे रस्ते यामुळे वाहनचालक संभ्रमित होत आहेत. लांबलचक वाटणारा रस्ता अचानक अन्य रस्त्याला वळवला जात असल्याने वाहन नियंत्रणात आणण्यास वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकांना व बस चालकांना वाहनाला लागलीच ब्रेक लावणे कठीण जात आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आलिशान वातानुकूलित कक्षात बसून व आलिशान वातानुकूलित शासनाच्या गाडीत फिरून जनतेला व तक्रार करणाऱ्यास येणाऱ्या नागरिकांना उपदेशाचे डोस देण्याचे काम उपविभागीय अभियंता मेश्राम यांच्या कार्यालयातून त्यांच्यामार्फत व त्यांच्या शाखा अभियंता मार्फत दररोज होताना दिसते मात्र, राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!