रवी साळुंखे यांची रायगड विभाग नियंत्रकांकडे मागणी
विनायक पाटील
पेण : सीएनजीवर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची धाव घेण्याची क्षमता कमी असल्याने मूळ ठिकाण गाठेपर्यंत प्रवाशांना दीड ते दोन तासांचा विलंब लागत असल्याने याबाबत प्रवाशांच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कंट्रोलर रामवाडी पेण कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी दाखल होऊन देखील एसटी महामंडळ दखल का घेत नाही याबाबत प्रवाशामधे असंतोष असून सीएनजीवर चालणाऱ्या एसटी बसेस बंद करुन त्या पुर्ववत डीझेल पेट्रोलवर चालू कराव्यात यासाठीचे तक्रार निवेदन अलिबाग येथील प्रवाशी रवी साळुंखे यांनी रामवाडी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालय विभाग नियंत्रकांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी दिनांक ३ फेब्रुवारी अलिबाग ते पुणे स्वारगेट या लांब पल्ल्याच्या गाडीमधून प्रवास करत असताना यांचा इतिवृत्तांत देताना म्हटले आहे की, एसटी क्रमांक एमएच ०६ बीएल ३०६६ बसमधून सायंकाळी ठिक ६ वाजता पेण बस स्थानकातून स्वारगेटकडे निघालेली बस सीएनजी इंधन भरण्यासाठी पेण सावरसई येथे तब्बल अर्धा तास थांबून ४५ प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागले हा कसला प्रकार बहुजन हिताय बहुजन सुखाय जे ब्रीद आहे त्याचं काय पुढे तर हा प्रवास कंटाळवाणा वाटणारा ठरला. खोपोली एक्स्प्रेस हायवेवर घाटात चढण चढताना तब्बल बारा वेळा बंद पडली. सीएनजी इंधनाचा वापर होत असताना गाडी गरम होते तेव्हा तापलेली गाडी बंद पडते. एकप्रकारे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतो आहे.
गाडीचा वेग ही कमी असल्याने गाडी निर्धारीत वेळेपेक्षा दिड ते दोन तास उशिराने स्थानकात पोहचते आणि प्रवाशांची गैरसोय होऊन रात्रीं अपरात्री आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय मनस्ताप सहन करावा लागतो ते वेगळेच. पेणवरुन सायंकाळी सहा वाजता सुटलेली गाडी पुणे स्वारगेटला रात्री नऊ वाजता पोहोचते. मात्र सीएनजी इंधन भरलेली ही बस त्या दिवशी रात्री ११.३० वाजता पोहचली आणि महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. याचा विचार एसटी महामंडळाने करुन सीएनजीवर धावणाऱ्या गाड्या तात्काळ बंद करुन त्या डिझेल पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या कराव्यात अशी मागणी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे करावी. डिजिटल भारत गतिमान भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा कार्यक्रम हाती घेतला असताना गतिविना वित्त गेले इतके अनर्थ ओढवून घेऊ नका नव्या युगाचा विकसीत भारत सामर्थ्यशाली भारत देशात वेगाची मर्यादा लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांमधे डिझेल- पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या गाड्या सुरू कराव्यात अन्यथा भडका उडण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन कार्यवाही करावी, हिच या निवेदनाद्वारे अपेक्षा करतो असे शेवटी रवी साळुंखे यांनी विभागीय नियंत्रक रामवाडी पेण यांना केले आहे.