अनंत नारंगीकर
चिरनेर-उरण
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिरनेर हे एक आगरी समाजाची वस्ती असलेले गाव. पनवेलपासून २२ किलोमीटर तर उरण शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले निसर्गरम्य गाव. आजूबाजूला डोंगर, तळी, खाडीने आच्छादलेल हे छोटस खेड गाव, ह्याच गावात एक जागृत श्री महागणपतीच देवस्थान आहे. आज हे देवस्थान इच्छापुर्ती करणारा चिरनेरचा महागणपती म्हणून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर गावचे हे मंदीर ऐतिहासिक नोंदीतले आहे. ह्या देवळाने इतिहास जोपासला आहे. यादव राजवटीच्या काळात महाराष्ट्रावर परकीयांचे आक्रमण झाले. यादवांचे राज्य अल्लाउद्दिनने १२९४ मध्ये उडविले. सुलतानशाही आणि पोर्तुगिजांच्या आक्रमणाने गणपतीच्या मुर्ती तळ्यात, विहिरीत आणि जमिनीत लपविण्यात आल्या. अशाच मार्गाने चिरनेरचा गणपतीही तळ्यात लपविण्यात आला अशी नोंद आहे.
चिरनेर येथील गणपतीच्या मंदिराची स्थापना नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दित झाली. त्यांचे सुभेदार रामाजी महादेव फडके हे पेशव्यांप्रमाणेच गणेशभक्त होते. धर्मासाठी छळ करणार्या पोर्तुगीजांचा पुढे पेशव्यांनी पराभव केला. नानासाहेब पेशव्यांनी उरण व पाली ही आंग्र्यांची ठिकाणे घेतली. सुभेदार व पेशवे सुभेदार रामजी फडके यांना चिरनेर गावच्या तळ्यातील गणपतीने दृष्टांत दिला की, “मी तळ्यात उपडा पडलो आहे. वर काढून माझी प्रतिष्ठापना करा.” मग तळ्या मध्ये मुर्तीची शोधाशोध सुरू झाली व गणेशमुर्ती तळ्यात सापडली. ह्या तळ्याला देवाचे तळे नाव पडले.सुभेदार रामाजी फडके यांनी तळ्यातून काढलेल्या गणपतीच्या मुर्तीची हेमाडपंथीय धाटणीच्या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ह्या गणपतीला तेव्हा पासून महागणपती संबोधण्यात येते. आता मंदीरावर बाहेरून प्लास्टरचे काम केले आहे.

चिरनेर येथिल महागणपतीच्या देवळाचा आकार १७ x १७ इतका आहे. आतील गाभारा १२ x १२ फुट आहे. गाभार्याचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाज्यावर गणेशपट्टी दिसुन येते. देवळाचा घुमट गोलाकार असून मुख्य घुमटाच्या चार बाजूला चबुतरे आहेत. मंदीराचा कळस गोलाकार घुमटावर बसविला आहे. मंदीरातील मूर्ती ७ फुट व रुंदी ३.५ फुट आहे. मुर्ती भव्य व शेंदूरचर्चित आहे. गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे.
चिरनेरच्या महागणपतीची मूर्ती तिळातिळाने वाढते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी ह्याची ख्याती पुर्ण उरण,पनवेल, नवीमुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई, पेण, अलिबाग, मुंबई परिसरात आहे. त्यामुळे आता इथे भक्तगणांची संख्या वाढली आहे. पुर्वी चिरनेर गावातील लोक न्यायनिवाडा करण्यासाठी गणपतीला कौल लावायचे. माघी गणेशोत्सव व संकष्ट चतुर्थीला गणेशमूर्तीला सजवण्यात येते.सोन्या चांदीचा मुकुट चढविण्यात येतो.इच्छा पुर्ती करणारा चिरनेरचा महागणपती म्हणून या देवस्थानची किर्ती साता समुद्रापार गेली आहे. आज न्हावा-शिवडी सी-लिंक (अटल सेतू) मुळे ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गाव हे मुंबई शहराजवळ अवघ्या अर्ध्या तासावर आल्याने या इच्छा पुरती करणारा चिरनेरचा श्री महागणपती देवस्थान व १९३० सालचा चिरनेर जंगल सत्याग्रह यामुळे गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.