खचलेल्या जेटीमुळे मोठ्या अपघाताची भीती
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर तसेच श्रीवर्धन या प्रसिध्द पर्यटनस्थळांना महत्त्वाकांक्षी जलमार्गाने जोडण्यात आले आहे. मात्र, या प्रवासात उपयुक्त असणाऱ्या जंगल जेटीचा भाग खचतोय. परिणामी येथील प्रवास धोकादायक बनला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्याकडे श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग आदी नयनरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर पर्यटन व्यवसायाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारी जंगल जेटीची निर्मिती २०१५ साली करण्यात आली. त्यामुळे पर्यटनात आणखी भर पडली आहे. विशेषतः श्रीवर्धन व मुरुड जंजीरा या दोन प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देत असताना दिघी बंदरातील होणारी जलवाहतुक, येथील ‘फेरी बोट’ प्रवाशांसाठी सोयीस्कर व पर्यटकांना आकर्षित करणारी ठरत आहे. मात्र, या मार्गावर जलवाहतुकीचा प्रवास करताना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून खचलेल्या जेटीकडे दुर्लक्ष झाल्याने याचा फटका येथील पर्यटनाला बसत आहे.
दिघी ते पलीकडे दांडा जल प्रवासास अवघे 15 मिनिटे लागतात. शिवाय बोटीतून वाहन घेऊन जाणे पुढील प्रवासाला सोपे असून, दरही आवाक्यात असल्याने दररोज अनेक प्रवासी जलप्रवासाला प्राधान्य देतात. मात्र, आता जेटी खचल्याने गाड्यांची आदळआपट होत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

भितीने बनतोय धोकादायक प्रवास
समुद्रातील अजस्त्र लाटांचा मारा झेलत पाण्यात उभी राहणारी बोट ज्यावेळी वाहन चढविताना रॅम्प जेटीच्या धक्क्याला लावून उभी राहत असते. त्यावेळी मोठी कसरत करून वाहनांना बोटीच्या आत जावे लागते. जेटीचा भाग खचल्याने त्यामार्गाची काही अंश असणारी समानता न राहील्याने वाहनांची घासाघस होऊन प्रवाशांना भितीने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
पर्यायी बाजूलाच असणाऱ्या दुसऱ्या जेटीचे कामकाज सुरू असून तेथून प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर येथील दुरूस्ती करण्यात येईल.
-सी. जे. लेपांडे,
मेरीटाईम बोर्ड अधिकारी