घनःश्याम कडू उरण : निर्यातीसाठी सरकारतर्फे राबविल्या जाणार्या योजनेचा गैरफायदा घेत बनावट बिले सादर करत नऊ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सीमा शुल्क विभागाच्या मुंबईतील 18 अधिकार्यांविरोधात एकूण 4 गुन्हे दाखल केले आहेत. हा घोटाळा झाला, तेव्हा हे सर्व अधिकारी जवाहरलाल नेहरु कस्टम हाऊस या सीमा शुल्क विभागाच्या मुख्यालयात कार्यरत होते. या प्रकरणी सर्वप्रथम केंद्रीय महसुल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकर्यांनीही तपास केल्याची माहिती आहे.
जवाहरलाल नेहरु पोर्टवरुन करण्यात येणार्या निर्यातीच्या रकमेवर काही प्रमाणात परतावा दिला जातो. याच योजनेचा फायदा घेत, काही निर्यातदारांशी संगनमत करत अधिकार्यांनी हा घोटाळा केल्याची माहिती आहे. यातील पहिले प्रकरण हे 2017 या वर्षातील एप्रिल ते जून या महिन्यांतील आहे.
अधिकार्यांनी 20 निर्यातदारांशी संधान साधले. त्यांच्याद्वारे प्रत्यक्षात कोणतीही निर्यात न करता निर्यातीची एकूण 93 बनावट बिले संमत करुन दिली व त्यावर आधारीत परतावा प्राप्त केला.
20 कंपन्यांच्या या प्रकरणात एकूण 4 कोटी 74 लाख रुपयांचा परतावा मिळाला होता, तर दुसरे प्रकरण हे 2017 याच वर्षातील असून, जून ते जुलै या दोन महिन्यांत याच कार्यपद्धतीचा वापर करत सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी एकूण 14 कंपन्यांची बोगस बिले संमत करत. 4 कोटी 4 लाख रुपयांचा परतावा प्राप्त करत सरकारी तिेोरीला गंडा घातला.
या मालिकेतील तिसरे प्रकरण हे ऑगस्ट ते सप्टेंबर 2017 मध्ये घडले आहे. या दरम्यान 11 निर्यातदार कंपन्यांशी संगनमत करत अधिकार्यांनी एकूण 7 लाख 8 हजारांचा घोटाळा केल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे.