मिलिंद माने
महाड : तालुक्यातील आंबिवली बुद्रुक व खुर्द या दोन गावात मागील दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले असून याबाबत त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18 जानेवारी रोजी लेखी पत्र देऊन देखील पंचायत समिती मार्फत कोणतीही कारवाई होत नसल्याने दूषित पाणीपुरवठ्यामुळे कावीळ व गॅस्ट्रोची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

महाड तालुक्यातील आंबिवली बुद्रुक व खुर्द या गावात नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा होत आहे. मात्र, नळाद्वारे पाणीपुरवठा होत असताना ज्या नागेश्वरी नदीमधून पाण्याचा पुरवठा नळाद्वारे या गावातील नागरिकांना होत आहे. त्या नागेश्वरी नदीच्या पात्रामध्ये पाळीव जनावरे देखील पाणी पिण्यासाठी त्याचा वापर करतात व नदीमध्ये ही जनावरे तासान तास बसत असल्याने तेथील नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. ज्या ठिकाणावरून या गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो ते पाणी नागरिकांना पिण्यायोग्य राहिलेले नाही.
आंबिवली बुद्रुक व आंबिवली खुर्द या दोन्ही गावातील नागरिकांनी मागील दोन महिन्यापासून गावात पिण्याचा पाण्याचा दूषित पुरवठा होत आहे याबाबत महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 18 जानेवारी रोजी लेखी निवेदन सादर केले. मात्र, त्यांच्या निवेदनाला केराची टोपली देण्याचे काम महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी केल्याने आज निवेदन देऊन महिन्याचा कालावधी होत असताना देखील याबाबत कोणतीही कार्यवाही पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली नाही.
आंबिवली बुद्रुक व आंबिवली खुर्द या गावातील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी वारंवार सांगून देखील त्यांनी जाणीवपूर्वक दूषित पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने वाढत्या तापमानाबरोबर मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचे दुर्भिक्ष जाणवत असताना या गावात आज देखील दूषित पाणीपुरवठा होत असल्याने दूषित पाण्यामुळे गावात कावीळ व गॅस्ट्रोची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाल्याचे याच गावातील माजी सरपंच रमेश पांडुरंग पवार यांनी सांगितले. गावात मोठ्या प्रमाणावर दूषित पाणीपुरवठा होत असल्याने याबाबतची तक्रार आम्ही पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे देखील केली मात्र, पाणीपुरवठा विभागाने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल या गावातील ग्रामस्थांनी केला आहे.