अनंत नारंगीकर
उरण : चिर्ले गावातील स्मशानभूमीवर निवाडा शेड नसल्याने गावातील लोकांना अंत्यविधी प्रसंगी ऊन, पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. तरी चिर्ले ग्रामपंचायतीने सदर स्मशानभूमीवर निवाडा शेड उभारणीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वेश्वी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडीत यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील चिर्ले ही ग्रामपंचायत शिवडी- न्हावा सीलिंक (अटल सेतू) या मुंबई शहराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पामुळे नावारूपाला आलेली ग्रामपंचायत आहे. मात्र, या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांच्या स्मशानभूमीत सुविधांचा अभाव तसेच निवारा शेड नसल्याने गावातील, परिसरातील अंत्यविधी प्रसंगी येणाऱ्या नागरिकांना ऊन, पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रात्रीच्यावेळी लाईटची सोय नसल्याने मृत व्यक्तीवर अंधारात अंत्यसंस्कार विधी पार पाडण्याची नामुष्की ओढवली जात आहे. तरी चिर्ले ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील स्मशानभूमीवर निवाडा शेड तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा वेश्वी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पंडीत यांनी केली आहे.