• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

काळजी घ्या! पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; सूर्य आग ओकणार

ByEditor

May 18, 2023

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर काही काळ राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं. त्यानंतर आता पुन्हा उन्हाचा ताप वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. एकदाचा कधी मान्सून येतो याचीच सारे प्रतीक्षा करत आहेत. मात्र, पुढील आणखी पाच दिवस तापमानाचा पारा असाच आणखी वाढत जाणार असल्याचा घाबरवणारा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जे तापमान कधी फक्त विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला मिळायचं ते आता मुंबईकरही अनुभवताहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे. पण, आता यात आणखी भर पडणार असून पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस दोन ते तीन अंशाने तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आधीच उष्णता खूप आहे, त्यात जर आणखी वाढ झाली तर उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू शकते.

गेल्या १५ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान वाढलं आहे. तर, पुढील पाच दिवस ते आणखी वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाडाच्या तुलनेत तरी इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असले तरी आद्र्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवेल. तर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी राज्यातील अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाचा उन्हाळा हा अधिक धोकादायक सिद्ध झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यावर्षी उष्माघाताचे १४७७ रुग्ण आढळून आले आहेत. काळजी करण्याचं कारण म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. २०२२ मध्ये उष्माघाताच्या ७६७ प्रकरणांची नोंद झाली होती. तर, २०२३ मध्ये उष्माघातामुळे डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढती उष्णता आणि सातत्याने उन्हामध्ये काम करत असल्याने शरीराचं डिहायड्रेशन होऊन मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.

काय काळजी घ्याल

  • गरज नसल्यास दुपारी उन्हामध्ये बाहेर पडू नका
  • सतत पाणी, ज्यूस, नारळ पाणी, ओआरएसचे पाणी प्या
  • डोक्यावर टोपी घाला किंवा रुमाल बांधा
  • सतत तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्या
https://youtu.be/6zRM_eZQrXI
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भूमिकेवर भास्कर जाधवांचा आक्षेप

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!