घन:श्याम कडू
उरण : तालुक्यातील धुतुम खाडी किनाऱ्यावर वेश्वी आदिवासी वाडीवरील काही मुले सायंकाळी ५ च्या सुमारास मासळी पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी जुनी असलेली बांधबंदिस्ती अचानक फुटल्याने चार मुले अडकली. त्यातील पेणमधील दोन मुले दगावली तर वेश्वीमधील दोन मुलांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केले जात आहे.
सदर आदिवासी मुलेही नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी सायंकाळी ५ वाजता दिघोडे-धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर गेली होती. त्यावेळी बांधबंदिस्ती फुटल्याने सदर मुलेही चिखलात रुतली. या दुर्दैवी घटनेत दोन मुले दगावली तर दोन मुलांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. मयत पेण वाडीमधील अविनाश सुरेश मिरकुटे, राजेश लक्ष्मण वाघमारे तर जखमी वेश्वी वाडीमधील गुरू सदानंद कातकरी, सूरज शाम वाघमारे असल्याचे समजते.
घटनास्थळी पोलिसांसह धुतुम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर, सदस्य प्रेमनाथ ठाकूर, वेश्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील तांबोळी यांनी घटनास्थळी जाऊन मदतीचा हातभार दिला. यातील दोघांना इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तर इतर दोघेजण दगावले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.