९५ टक्क्यांपेक्षा जास्त कंत्राटी कामगार सहभागी
विठ्ठल ममताबादे
उरण : राज्यातील तीनही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांची कंत्राटदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसह कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे राज्यातील सुमारे ४२ हजार वीज कंत्राटी कामगारांतर्फे दिनांक ५ मार्च २०२४ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

पुण्यातील रास्ता पेठ येथील विद्युत पारेषण वितरण कंपनीसमोर आंदोलन करून बेमुदत संप पुकारण्यात आला. यावेळी ऊर्जामंत्री यांनी दखल घेवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कृती समिती पदाधिकारी निलेश खरात यांनी रास्ता पेठ कार्यालयासमोर आंदोलनात व्यक्त केली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे, त्यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा या वीज कंत्राटी कामगारांनी व्यक्त केली. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार या आंदोलनात सामील झाले आहेत. प्रशासन जर या मागण्यांकडे कानाडोळा करत असेल तर कंत्राटी कामगारांतर्फे बेमुदत आंदोलन असेच पुढे सुरू राहणार आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्या संदर्भात लवकर विचार करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार कृती समिती संघटक सचिन मेंगाळे व निलेश खरात यांनी व्यक्त केली आहे. पुणे रास्ता पेठ कार्यालयासमोर निलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आणेराव, सागर पवार, सुमीत कांबळे, निखिल टेकावडे, मार्गदीप म्हस्के व इतर पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्वच विभागातील कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. या बेमुदत संपात महाराष्ट्र राज्यातील विद्युत क्षेत्रातील मुख्य कार्यालय मुंबई तसेच ठाणे, भांडुप, पनवेल, महाड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कंत्राटी कामगार एकजुटीने सहभागी झाले आहेत अशी माहिती सचिन मेंगाळे यांनी दिली आहे