पालकमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
विनायक पाटील
पेण : विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये संपादीत होणाऱ्या जमिनींना अधिकचा भाव मिळावा यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली आहे. याबाबत वैकुंठशेठ पाटील व जगदीश ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पनवेल येथे पालकमंत्री उदय सामंत, रायगड जिल्हाधिकारी जावळे यांच्यासह बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, वैकुंठ पाटील, जगदिश ठाकुर, कोपर सरपंच नवनाथ म्हात्रे, ऍड. जगदिश पाटील – उपसरपंच आंबिवली व इतर शेतकरी उपस्थित होते.

अलिबाग विरार कॉरिडोरमध्ये ज्या जमिनी संपादीत होणार आहेत त्या शेतकऱ्यांचे प्रश्न वैकुंठ पाटील व जगदीश ठाकूर यांनी मांडले. बाधीत संपादीत जमिनींना सरसकट वाढीव मोबदला मिळावा. याबाबत आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्यावर पालकमंत्री उदयजी सामंत यांनी १४ मार्च रोजी बैठक आयोजित केली आहे. ही बैठक होत नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देऊ नये अश्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.
पेण तालुक्यातील विरार-अलिबाग कॉरीडोर उत्कर्ष समिती शेतकरी संघटनेच्या वतीने पेण तालुक्यातुन जाणारा अति जलद विरार-अलिबाग रस्त्याचे भुसंपादनाचे काम अंतिम टप्यात आले आहे. सदर भुसंपादनाचे जमिनीचे मोबदला मुल्य निश्चित करताना शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही व शेतकऱ्यांना विश्वासात घेवून दर ठरविण्यात यावा, पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागास वेगळा दर व त्याच्या लगत असणाऱ्या पेण तालुक्यातील जमिनीला कमी दर अशी तफावत करण्यात येऊ नये, सदर जमिनीचा मोबदला कमीत कमी प्रति गुंठे २० लाख मिळावा या व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अलिबाग-विरार कॉरीडोरच्या रत्याच्या भूसंपादनाच्या मोबदला केवळ नगरविभागाच्या आडमुठी धोरणामुळे आमच्या माहितीप्रमाणे सदर जागेचा दर हा विकसीत जमिन दराप्रमाणे देणे आवश्यक होते परंतु नगररचना विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे केवळ जमिन दर म्हणुन विचार केला जात आहे. पेण तालुक्यातील शेतकरी शेतजमिन विकण्यासाठी गेला असता दुय्यम निबंधक त्याच्या जमिनीवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क हे प्रति गुंठा ३ लाख ८८ हजार याप्रमाणे आकारले जात आहे. या वस्तुस्थितीकडे ३ लाख ८८ हजार रुपये विकसीत जमिन दर म्हणुन त्यावर स्टॅम्प डयुटी आकारणी होत आहे. परंतु या वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन केवळ ३० हजार रुपये प्रति गुंठा पडिक जमिन म्हणुन दर निश्चित करुन अन्याय होत आहे. मा. प्रांतअधिकारी यांनी हमरापूर गावातील दिलेल्या नोटिसप्रमाणे तेथील जमिनीचा दर हा केवळ पडिक जमिन म्हणुन ८८,२४० रुपये दर इतका निश्चित केल्याचे कळविले आहे. व याचप्रमाणे पेण तालुक्यतील उर्वरित गावांना देखिल दर निश्चित केला जाणार आहे. अशा पध्दतीने दर निश्चिती पेण तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होईल. त्यासाठी उदय सामंत यांनी पेणचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील व पेण तालुक्यातील रावे, कोपर, गोविर्ले, हमरापूर, जिते, आंबिविली, बळवली, शितोळे या गावातील सर्व शेतकऱ्यांना सदर मिटिंगमध्ये सहभागी करुन घेवून प्रति गुंठा २० लाख भाव ठरवून सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मोबदला देण्यात यावा, अन्यथा सर्व गावातील शेतकरी बांधव मोठे आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे.