ग्राम प्रदक्षिणेत ग्रामस्थांचा प्रचंड उत्साह
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यात धाटाव गावातील तलावाजवळ असलेल्या प्राचीन श्री शंभू महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळीच ओम नम:शिवाय हा पंचाक्षरी मंत्र उच्चारत लाखो भाविकांनी श्री मल्लिकार्जुन महाराजांना त्रिद्ल बिल्वपत्रांची पुष्पांजली अर्पण करून जलाभिषेक तथा पंचामृताने जलाभिषेक केला. आज मोठ्या उत्साहात निघालेल्या पालखी सोहळ्यात “हर हर महादेव, मल्लिकार्जुन महाराज कि जय” अशा जयघोषाने संबंध धाटाव नगरी दुमदुमली.
आज माघ महिन्याच्या कृ. १३ श्रवण या मुहूर्तावर सकाळी मंदिरात विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे श्री शंभू महादेवाची पालखी सायंकाळी ४ वाजता ग्रामप्रक्षिणेकरिता निघाली. या पालखी दरम्यान हभप रायगड भूषण पुरूषोत्तम पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सांप्रदाय मंडळी हरिपाठ, भजनात दंग झाले होते. तर ज्येष्ठ महिलावर्गाने आपल्या सुमधुर आवाजात पारंपारिक गाणी सादर करीत पालखी सोहोळ्याळा चांगलीच रंगत आणली. त्यातच खालुबाजा आणि टाळ, मृदुंगाच्या नादाने येथील वातावरण भक्तिमय झाले होते. गावात घरोघरी पालखीचे जल्लोषात स्वागत करून दारोदारी औक्षण करण्यात आले. तर काही ठिकाणी चिमुरड्यांना पालखीवरून घेतले जात होते.
माघ महिन्यात होणाऱ्या या महाशिवरात्रीच्या पालखीचे दर्शन गावातील सर्वच ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतले. पुष्पहार, नारळ, पेढयांचा प्रसाद घराघरातून देवाला दिला जात होता. विठ्ठल मंदिरात खिचडी आणि केळ्याचा अल्पोपहार देण्यात आला. उशिरा पालखी मंदिरात गेल्यावर सर्वांनी महाप्रसाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.