नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गोयल अशा प्रकारे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, याची साधी कल्पनाही कुणाला नव्हती. तीन दिवसांनंतर निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे आणि दोन दिवसांपूर्वी आयोग पश्चिम बंगालचा दौरा करून परतला आहे. एकीकडे आयोग देशभरात निवडणुकांच्या पूर्ण तयारीवर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे, अशा बातम्यांमुळेच गोयल यांनी असे पाऊल का उचलले असा प्रश्न निर्माण होतो. शनिवारी 9 मार्च रोजी केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयानेही त्यांचा राजीनामा स्वीकारत अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्याची विनंती राष्ट्रपतींना करण्यात आली आहे. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनीही हा राजीनामा मंजूर केल्याची माहिती आहे.
अरुण गोयल यांनी अशा प्रकारे राजीनामा देण्यामागे मोठे कारण असू शकते, असे मानले जात आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्याचवेळी हा राजीनामाही महत्त्वाचा ठरतो कारण मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त अरुण गोयल हे सध्या निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत होते. तर आयोगात एकूण ३ जण आहेत. म्हणजे आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत.