• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवारासाठी अनुकूल; तरी लढत होणार अटीतटीची!

ByEditor

Mar 23, 2024

किरण लाड
नागोठणे :
18व्या लोकसभेचा बिगुल वाजला आहे. निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवारासाठी जरी अनुकूल असला तरी निवडणूक अटीतटीची होणार आहे असे सद्यातरी चित्र दिसत आहे.

सन 2008 साली पुर्नरचेनंतर रायगड लोकसभा मतदार संघ निर्माण करण्यात आला. रायगड लोकसभा मतदार संघ हा सहा विधानसभा मतदार संघ मिळून बनलेला आहे. या मतदार संघात रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड हे चार मतदार संघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर हे दोन विधानसभा मतदार संघ येतात.‌ या मतदार संघात एकूण 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 8 लाख 13 हजार 516 एवढी आहे. तर महिला मतदारांची संख्या 8 लाख 40 हजार 419 एवढी लक्षणीय आहे. यामध्ये 8 हजार 46 दिव्यांग मतदारांची संख्या आहे. तर 18 ते 19 वयोगटातील 16 हजार 288 मतदार मतदान करणार आहेत. तर 85 वर्ष वयापेक्षा अधिक असणारे 31 हजार 28 मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष (अजित पवार गट) व इतर पक्ष यांची महायुती तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष (शरद पवार गट) व इतर अशी महाविकास आघाडी यांच्यात महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात लढत पहावयास मिळणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात भाजपचा एक आमदार, शिवसेना (शिंदे गट) तीन, राष्ट्रवादी काॅंग्रेसचा एक आमदार तर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक आमदार असे पक्षीय बलाबल आहे. पेण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे आमदार रविशेठ पाटील करतात, तर अलिबाग, महाड, दापोली मतदार संघाचे प्रतिनिधीत्व शिवसेना शिंदे‌ गटाचे महेंद्र दळवी, भरतशेठ,गोगावले व योगेश कदम हे आमदार करतात. श्रीवर्धन मतदार संघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, मंत्री आदिती तटकरे‌ करतात. तर गुहागर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे भास्कर जाधव करतात. कोकणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधीत्व विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे करीत आहेत.

रायगड लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यामान खासदार सुनील तटकरे व पेण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाजपचे धैर्यशील पाटील इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा जवळपास 31,621 मतांनी पराभव केला होता. सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना, भाजपची युती होती. परंतु, आता पुष्कळ पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. बघायला गेलो तर रायगड लोकसभा मतदार संघावर महायुतीची पकड दिसत आहे कारण सहा विधानसभा मतदार संघामध्ये पाच आमदार हे महायुतीचे आहेत. तर केवळ एक आमदार भास्कर जाधव यांच्या रुपात महाविकास आघाडीकडे आहे. रायगड लोकसभा मतदार संघावर असणारी महायुतीची ताकद त्यांच्या आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याने सद्यातरी कागदावरच दिसत आहे.

पेण विधानसभा मतदार संघाचे शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना पक्षश्रेष्ठींनी रायगड लोकसभेची तयारी करायला सांगितली होती. त्याप्रमाणे त्यांनी मतदार संघात पक्षबांधणी, मेळावे घेण्यास सुरुवात देखील केली होती. मात्र महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीची एन्ट्री झाली आणि हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात देखील केली आहे. रायगड लोकसभेची निवडणूक 7 मे रोजी होणार असून नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची तारीख 12 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत असणार आहे. या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरणार आहेत. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या सुमन कोळी यांना 23 हजार 42 एवढे मतदान झाले होते. वंचित जर महाविकास आघाडीत सामील झाली तर त्याचा थेट फायदा अनंत गीते यांना होणार आहे. एकंदरीत महायुतीकडून विद्यामान खासदार तटकरे यांना लोकसभेचे तिकीट मिळाले तरी त्यांना या निवडणूकीत भरपुर मेहनत घ्यावी लागणार आहे. शिंदे गटातील आमदार तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची समजुत काढून त्यांची एकत्रित मोट बांधावी लागणार आहे. तसेच त्यांनी मतदार संघात केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहचावी लागणार आहेत. तसेच त्यांची जमेची बाजु म्हणजे त्यांचे प्रत्येक कार्यकर्त्याशी असलेले संबंध. मुस्लिम मोहल्यांतील लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध कामास येतील का? हे ही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच त्यांची मुलगी मंत्री आदिती तटकरे व मुलगा विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी मतदार संघात केलेली विकास कामे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतदारांचा असलेला विश्वास त्यांना विजयपथा पर्यंत नेतात का? हे ही लवकरच समजणार आहे.

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे ही महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभेसाठी इच्कुक आहेत. त्यांची जमेची बाजु म्हणजे त्यांनी सहावेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सामिल असल्याने तसेच मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे असल्याने गीतेंना यावेळी आपल्या विजयाची खात्री वाटते. अशी जरी रायगड लोकसभा मतदार संघाची पार्श्वभूमी असली तरी, महायुती तसेच महाविकास आघाडीचा जो कोणी आमदार, कार्यकर्ता लोकसभा निवडणुकीत एकजुटीने काम करील त्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल असे चित्र सद्यातरी रायगड लोकसभा मतदार संघात दिसत असले तरी, महागाई, बेकारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, एमआयडीसीकडून जागा अधिग्रहणांचे प्रश्न, अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, गेली 14 वर्ष रखडलेला मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा प्रश्न अशा मतदारांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे लोकसभेच्या निवडणूकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांना द्यावी लागणार आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!