मिलिंद माने
महाड : तालुक्यातील भावे गावाजवळ असलेल्या सुमय्या गार्डन या हॉटेलमधील जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याला दोन तरुणांनी मारहाण केली. चाकूचा वापर करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
महाड-भोर-पंढरपूर मार्गावरील भावे गावाजवळ असलेल्या सुमय्या गार्डन हॉटेलमध्ये आलेल्या दोन तरुणांनी हॉटेलमधील आचाऱ्याला मारहाण केली. चाकूने त्याच्या हातावर आणि मांडीवर वार केल्याने सदर आचारी जखमी झाला आहे. महाड औद्योगिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमय्या गार्डन येथे सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास शुभम उर्फ राज अनंत तांबे (वय २३ राहणार भावे) व अमृत अनंत तांबे (वय २३ रा. भावे) या दोघांनी बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे (वय ४०) यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये बाळकृष्ण रामचंद्र साळुंखे हे जखमी झाले आहेत. आम्ही मुंबईचे भाई आहोत तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देखील त्यांनी यावेळी दिली.
महाड औद्योगिक पोलीस ठाणे पोलिसांनी सदर आरोपींना अटक करून त्यांच्यावर भादवि कलम ३०७, ३३६, ५०४, ५०६, ३४ सह मुंबई पोलीस अधिनियमचे कलम ३७ (१) (३) / १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.