मुंबई : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली जाहिरात, त्यावेळी घडलेलं राजकारण त्यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांची भूमिका याबद्दल भाष्य केलं. जाहिरात देऊन लोकांनी चूक केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर, २०१९ ला सत्ता स्थापन करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डबल गेम केला, असंही ते म्हणाले.
आमच्यामध्ये कोणताही लढा नाही. एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं चुकीची जाहिरात गेली आहे. आमच्या लोकांनी चूक केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि आमच्यामध्ये ज्या प्रकारचा समन्वय आहे, तसा दुसऱ्या आघाडी सरकारमध्ये कदाचित पाहायला मिळू शकतो. कारण, मी कधीच त्यांचा मान सन्मान आणि प्रोटोकॉल तोडत नाही आणि ते मला कधीच वाटू देत नाहीत की मुख्यमंत्री आहे. आम्ही ही जी मर्यादा सांभाळली आहे, यामुळं आम्ही पुढं जात आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही वेळा पक्षांमध्ये कमी डोक्याची माणसं असतात आणि चुका करतात. इतक्या छोट्या चुकीवर आमच्यात मतभेद होतील आणि सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल, विरोधकांना वाटलं होतं मतभेद निर्माण होतील पण येणार नाहीत, कारण आम्ही सरकार एका विचारानं बनवलं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डबल गेम केल्याचं फडणवीस म्हणाले. मी आणि अजित पवार सरकारचं नेतृत्त्व करणार असं ठरलं होतं. त्याबाबत सर्व चर्चा झाल्या होत्या. मात्र, शपथविधीच्या चार दिवस अगोदर शरद पवारांनी भूमिका बदलल्याचं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलं.