कोंबडीचे पीसे, आतडी नदीत टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
मिलिंद माने
महाड : महाड तालुक्यातील नद्या एकीकडे रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित होत असतानाच शहर, तसेच ग्रामीण भागातील चिकन, मटण विक्रेते त्यांचा कचरा थेट नदीत टाकत असल्यामुळे नद्यांचे पाणी अधिकच प्रदूषित होत आहे. अशा चिकन, मटन विक्रेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे तालुक्यातील काळ, सावित्री, गांधारी या नद्या आधीच प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण काही अंशी कमी झाले असले तरी कमी अधिक प्रमाणात अनेक कारणांमुळे आजही नदी दूषित होत आहे. शिवाय नागरिक वस्तीमधील सांडपाणी देखील प्रक्रिया होत नसल्याने थेट नदीत जावून प्रदूषण सुरूच आहे. त्यात आता चिकन, मटण विक्रेत्यांकडून भर घातली जात आहे.

शहर तसेच ग्रामीण भागातील चिकन, मटण विक्रेत्यांकडून कचरा थेट नदीत टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत यापूर्वी देखील पालिका आणि जिल्हा परिषदेने या विक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचना धुडकावून लावत कोंबडीची पिसे, आतडी आणि इतर कचरा थेट नदीत टाकला जात आहे. यामुळे नदीतील जलचरांचे जीवन देखील धोक्यात आले आहे. नदीत टाकलेल्या या कचऱ्यामुळे या परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे.
महाड शहराजवळ असलेल्या गांधारी नदी किनारी गांधारी पुलाजवळ असलेल्या मटन विक्रेत्यांकडून हा कचरा पुलावरून थेट नदीत टाकला जात आहे. यामुळे या पूलाजवळून ये-जा करताना नागरिकांना तोंडावर रुमाल धरावा लागत आहे. हीच स्थिती नाते खिंड, सुकट गल्ली आदी ठिकाणी दिसून येत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील बिरवाडी गावात देखील अशीच स्थिती आहे. बिरवाडी बाजारपेठेतील चिकन, मटण विक्रेत्यांकडून हा कचरा देखील सावित्री आणि काळ नदीत टाकून दिला जात आहे. बिरवाडी आणि दादली गावाजवळ देखील हीच अवस्था आहे. शहरातील सावित्री, गांधारी, आणि काळ या तिन्ही नद्यांमध्ये चिकन विक्रेत्यांकडून चिकनचा कचरा नदीत टाकून दिला जात आहे.
यातील अनेक चिकन, मटण विक्रेत्यांकडे परवाना देखील नाही. काही वर्षापूर्वी रायगड जिल्हा परिषदेने या चिकन विक्रेत्यांना परवाने दिले होते. मात्र, हे परवाने त्यानंतर बंद झाले. महाड नगरपालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील मांस विक्रेत्यांना रीतसर परवाने दिले जावे आणि नदीत कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे. महाड नगरपरिषदेकडून अशा विक्रेत्यांना नोटीस बजावली जाईल असे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी सांगितले.